वाडा : वाडा तालुक्यातील वसुरी बुद्रुक (घोडमाळ) येथे स्वातंत्र्यपुर्व काळात सांबरे कुटुंबीयांच्या पूर्वजांनी सुरू केलेल्या परंपरागत गणेशोत्सवा”ला यावर्षी १२५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने विविध व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दरवर्षी सांबरे कुटुंबियांकडे पूर्वजांच्या काळात सुरु केलेला दीड दिवसांचा “गणेशोत्सव” आजही आनंदात साजरा केला जातो. बाप्पाचे आगमन मोठ्या थाटामाटात होत असते, तर विसर्जन वैतरणा नदीच्या पात्रात केले जाते.
बाप्पाचे आगमन व बाप्पाला निरोप (विसर्जन)” देखील मोठ्या ढोल, ताशाच्या गजरात भव्य दिव्य मिरवणूक काढून आतषबाजी करण्यात आली. यावेळी मुले, महिला, पुरुष व परिसरातील नातेवाईक मंडळी मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती. त्यांनी माथ्यावर टोप्या तर गळ्यात गणपती “बाप्पा मोरया” लिहिलेल्या पट्ट्या घातल्या होत्या. त्यावर वर्षे १२५ वे असे लिहिले होते.
विशेष म्हणजे “गणपती”बाप्पा”ची बसण्याची जागा इतक्या वर्षात आजपर्यंत कधीही बदललेली नसुनही त्यात खंड देखील कधी पडलेला नाही.
“हरे कृष्णा हरे रामा” यांचे भजन
गणेश बाप्पाच्या आगमनानंतर बाप्पाला पर्यावरण पुरक मखर व मोराच्या साकारलेल्या देखाव्यात बसवून “श्री गणेशा”ची यथोचित पुजा, आरती केली. यानंतर गालतरे येथील “हरे कृष्णा हरे रामा” यांचे भजन व त्यानंतर किर्तन झाले. शिवाय सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले. यावेळी भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी “बाप्पा”चा दर्शनाचे लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाडा तालुक्यातील वसुरी बुद्रुक (घोडमाळ) येथील कै. वालकु पद्मण सांबरे यांनी १९०१ साली दीड दिवसांचा गणपती घरी बसवून खऱ्या अर्थाने लगणेशोत्सव साजरा करण्याची ग्रामीण व दुर्गम भागात मुहूर्तमेढ रोवली आहे. पुढे त्यांचा मुलगा बाबू सांबरे, नातू कै.तुकाराम सांबरे व त्यांच्या पिढीने अखंडीत सुरू ठेवला आहे.
पूर्वजांनी १९०१ साली सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा पाहता-पाहता १२५ वर्षानंतरही टिकून राहिली आहे. यापुढेही भाऊ, मुले, नातवंडे, पणतवंडे देखील गणपती उत्सव असाच सुरू ठेवणार असल्याचे मनःपूर्वक समाधान वाटते असे कै. वालकू पद्मण सांबरे यांचे वंशज विलास सांबरे व कुमार सांबरे यांनी सांगितले.