वर्तकनगर हद्दीतील हरवलेले १००५ मोबाईल हस्तगत

ठाणे : वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सन २०१८ ते मार्च २०२३ पर्यंत तब्बल १००५ मोबाईल फोन हरवले होते आणि यावर्षीच्या प्रारंभापासून ते मार्चपर्यंत १२५ मोबाईल फोन हरवले होते. तांत्रिक विश्लेषण करुन हे मोबाईल फोन संच शोधण्यात वर्तकनगर पोलिसांना यश आले.

या वर्षाच्या सुरुवातीपासून वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल फोन हरवले असल्याबाबतच्या तक्रारी वेळोेवेळी नोंदवण्यात आल्या होत्या. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात नियुक्त असलेल्या महिला पोलीस हवालदार यशोदा घोडे व हवालदार रविंद्र रावते हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हरवलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्याचे काम ते करतात. यशोदा घोडे आणि रावते यांनी हरवलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्याकरीता फोनसंबंधीची माहिती मिळवण्याकरीता संबंधित मोबाईल कंपनीच्या सर्व्हिस प्रोव्हायडर यांच्याशी पत्रव्यवहार केला आणि तांत्रिक माहिती मिळवली. तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तमिळनाडू व गुजराथ या राज्यांतील संबंधितांकडून कुरिअरद्वारे मागवून घेतले आहेत.

वागळे इस्टेट विभागाचे उपायुक्त अमरसिंह जाधव तसेच सहाय्यक आयुक्त अनिल देशमुख, वरिष्ठ निरीक्षक सदाशिव कदम, पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली यशोदा घोडे आणि हवालदार रावते यांनी ही कामगिरी केली.

पोलीस आयुक्तांच्या मासिक भेटीदरम्यान ४० मोबाईल संच मुळ मालकांना परत करण्यात आले आहेत. मालकांना त्यांचे मोबाईल संच मुद्देमाल (मोबाईल) हस्तांतरण कार्यक्रमात परत मिळाल्याचा आनंद चेह-यावर झळकत होता.