ठाणे : ठाणे सिव्हिल रुग्णालयात मोठ्या कौशल्याने एका ४९ वर्षीय महिलेच्या मणक्याची (स्पाईन) तीन तासांची अवघड शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे. रुग्णालयीन देखरेखीनंतर महिलेला बुधवारी घरी सोडण्यात आले.
ठाणेकर असलेल्या एका महिलेच्या पाठीत गेल्या अडीच वर्षांपासून दुखत होते. कालांतराने त्यांच्या शरीराच्या हालचाली जवळपास बंद झाल्या. तिने निकटच्या खाजगी डॉक्टरांना दाखवल्यानंतर पाठीच्या मणक्याची नस दबली आहे, असे स्पष्ट झाल्यामुळे तत्काळ शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला.
सिव्हिल रुग्णालयाचे नुकतेच स्थलांतर झाले आहे. त्यामुळे मणक्याच्या शस्त्रक्रियेचे आव्हान मोठे होते. परंतु, रुग्णालयातील संबंधित वैद्यकीय तज्ज्ञांवर डॉ. कैलास पवार यांचा पूर्ण विश्वास होता. रुग्णालयाचे अस्थि व्यंगतज्ज्ञ डॉ. विलास साळवे, डॉ. प्रियांका महांगडे, डॉ. रुपाली यादव, डॉ. अश्विन शिंदे, डॉ. सुशांत गवादे, डॉ. श्रीजीत शिंदे यांच्यासह खासगी स्पाईन तज्ज्ञ डॉ. विश्वनाथ कांबळे यांना पाचारण करण्यात आले होते.
या महिलेची घरची परिस्थिती बिकट असल्याने तिला खाजगी रुग्णालयातील खर्च परवडणारा नव्हता. तरीही कुटुंबियांनी कर्ज काढून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मात्र एका व्यक्तीने ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले.
डॉ. पवार यांनी महिलेच्या कुटुंबाला धीर दिला आणि आपण ही शस्त्रक्रिया सिव्हिलमध्ये करू. खर्चाची चिंता करू नका, रुग्णालयातील संबंधित वैद्यकीय अधिकारी अनुभवी आहेत, असेही समजावले. त्यानंतर त्या महिलेला धीर आला आणि सिव्हिल रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी महिला दाखल झाली, असे अस्थिव्यंग तज्ज्ञ डॉ. विलास साळवे यांनी सांगितले.
संपूर्ण टीमने तीन तासांची अवघड शस्त्रक्रिया केली. मात्र दरम्यानच्या वेळात कुटुंबातील सदस्यांची धाकधूक वाढली होती. अखेर शस्त्रक्रिया यशस्वी झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर कुटुंबातील सदस्यांच्या चेह-यावर वेगळाच आनंद तरळताना दिसला. रुग्णालयात देखरेखीनंतर बुधवारी या महिलेला घरी पाठवण्यात आले.
पाठीच्या मणक्यांची शस्त्रक्रिया करण्यासाठी खाजगी रुग्णालयात तीन ते पाच लाख रुपये खर्च सांगितला होता. आमची परस्थिती तशी बेताची आहे. डॉ. पवार यांनी आम्हाला मोठा आधार दिला. रुग्णालयाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत, असे रुग्णाचे नातेवाईक फ्रँक पॉवेल म्हणाले.
रुग्णाला चांगले उपचार मिळावेत या हेतूने रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी काम करत आहेत. स्थलांतर झाल्यावरही रुग्णाला उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न असतो, असे डॉ. पवार म्हणाले.