सत्ताधाऱ्यांच्या बॅनर्सना अभय; वज्रमूठ सभेच्या फलकांवर कारवाई

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

ठाणे : महाविकास आघाडीची मुंबईला होत असलेल्या वज्रमूठ सभेचे बॅनर्स ठाणे शहरात विविध ठिकाणी लावण्यात आले होते. ठाणे महापालिकेने या बॅनर्सवर कारवाई करून हे बॅनर्स काढल्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मात्र पालिकेच्या या कारवाईमुळे प्रशासनावर जोरदार टीका केली आहे.

सत्ताधाऱ्यांच्या बॅनर्सला एकीकडे प्रशासनाकडून अभय दिले जाते विरोधकांच्या बॅनर्सवर मात्र कारवाई केली जाते, अशा अधिकाऱ्यांचे अभिनंदनच करायला हवे असे सांगत जसे सत्ताधाऱ्यांना सांभाळून घेता तसेच आम्हालाला सांभाळून घ्या असा टोला आव्हाड यांनी प्रशासनाला लगावला आहे.

येत्या १ मे रोजी महाविकास आघाडीची मुंबईत वज्रमूठ सभा होणार आहे. या सभेची जोरदार तयार सुरु असतांनाच राष्ट्रवादीने ठाण्यातील विशेष करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच मतदार संघात या संदर्भातील बॅनरबाजी केली होती. एकप्रकारे राष्ट्रवादीने वागळे, किसननगर भागात बॅनर लावून शक्तीप्रदर्शन करण्याचाच प्रयत्न केला होता. शहराच्या इतर भागात अगदी तुरळक बॅनर दिसत असतांना वागळे पट्ट्यात मात्र अधिक संख्येने बॅनर लावण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले होते. आम्ही केवळ मोठ्या संख्येने नागरीकांनी यावेत या उद्देशाने हे बॅनर लावले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली आहे.

ठाणे महापालिकेने आता महाविकास आघाडीच्या सभेच्या बॅनर्सवर कारवाई करून हे बॅनर्स हटवले आहेत. ही कारवाई करत असताना सत्ताधाऱ्यांच्या बॅनर्सला अभय देण्यात आले असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. यासंदर्भात संबंधित पालिका अधिकाऱ्याला दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु अधिकाऱ्याने फोन उचलला नसल्याचे आव्हाड यांनी सांगितले. एवढ्या तत्परतेने कर्तव्य बजावणाऱ्या पालिका अधिकाऱ्याचा दूरध्वनी व्हायरल करून या अधिकाऱ्याचा सत्कारच केला पाहिजे, असा उपरोधिक टोलाही आव्हाड यांनी पालिका प्रशासनाला लगावला आहे.