* नाला बंदिस्तीचे काम सुरु
* रस्ते सिमेंटीकरण लवकर होणार पूर्ण
डोंबिवली : पावसाळ्यात दरवर्षी डोंबिवलीतील नांदिवली, स्वामी समर्थ चौक परिसर या भागात पाणी साचत होते. सायंकाळी घरी परतत असलेल्या शाळेतील विद्यार्थी आणि चाकरमान्यांना गुडघाभर पाण्यातून मार्ग काढत घरी परतावे लागायचे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील एमएमआरडीएच्या ४४५ कोटींच्या विविध रस्त्यांचे नोव्हेंबर २०२२ मध्ये भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. फेब्रुवारीमध्ये या कामाची प्रत्यक्षात सुरुवात देखील झाली.
नांदिवली नाला ते स्वामी समर्थ मठ दरम्यानच्या रस्त्याचे सिमेंटीकरण, सात हजार मीटरचे नाला बंदिस्तीचे काम सुरु असून पूर्ण होईपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. ‘एमएमआरडीए’ने रस्ते बांधकाम पूर्ण झाल्याचे कळविल्यावर हे रस्ते पुन्हा वाहतुकीसाठी खुले केले जाणार आहेत.
नांदिवली नाला ते नांदिवली तलाव रस्ता सर्वाधिक धुळीने भरला आहे. सर्व प्रकारची वाहतूक या रस्त्यावरुन होते. मानपाडा रस्त्याचे काम सुरू असल्याने काटई शिळफाटा रस्ता दिशेकडील वाहने पी ॲन्डी टी काॅलनी मधील हनुमान मंदिरा समोरील रस्त्याने डोंबिवलीत येतात. काही वाहने स्वामी समर्थ मठाकडे जातात.
स्वामी समर्थ चौक ते नांदिवली टेकडी या भागात पावसाळ्यात घुडगाभर पाणी साचून रस्ता वाहून जात होता. रस्त्यांवर खड्डेच खड्डेच पडायचे. त्यामुळे आजूबाजूच्या भाज्यांच्या दुकांमध्येही पाणी गेल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत व्हायचे. वाहनांना देखील यातून कसेबसे जावे लागायचे. दुचाकी तर अक्षरशः पाण्यात बंद पडून ढकलत न्याव्या लागायच्या. या रस्त्यावर नाला बंदिस्तीचे काम तसेच सिमेंटीकरण सुरु असल्याने आता तरी तुंबणाऱ्या पाण्यातून कायमची सुटका होईल असे चित्र दिसते. यामुळे नागरिकांमध्ये समाधान पाहायला मिळते.