कळव्यात कारवाईनंतरही चढले मजले; माजिवड्यात कारवाईच नाही

गावदेवी, खारीगांव, विटावा, बाळकुममध्ये बांधकामे जोरात

ठाणे : कळवा प्रभाग समिती क्षेत्रात कारवाई झालेल्या इमारतींवर पुन्हा मजले चढवण्याचे काम सुरू झाले असून या धोकादायक बांधकामांना भविष्यात जीवितहानीची भीती व्यक्त होत आहे तर माजिवडे-मानपाडा प्रभागात असंख्य तक्रारीनंतर अनधिकृत बांधकामांवर कारवाईच होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

जयभारत मैदानाच्या शेजारी एका अनधिकृत इमारतीचे काम सुरु असून सात दिवसांपूर्वीच या इमारतीवर ठाणे महापालिकेने कारवाई करण्यात आली होती. मात्र सात दिवस उलटत नाही तोच या इमारतीवर पुन्हा एकदा दोन अनधिकृत मजले उभे राहिले आहेत. गावदेवी, विटावा आणि खारीगांव परिसरातही अशा अनेक इमारती आहे ज्या इमारतींवर कारवाई करूनही अनधिकृत मजले उभारून या इमारती पूर्ण करण्याचे काम रात्रंदिवस सुरु असल्याचे आढळून आले आहे.

महापालिका प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच कळवा प्रभाग समिती क्षेत्रात २५ अनधिकृत बांधकामे सुरु असल्याची कबुली दिली होती. प्रशासनाचे वाभाडे निघत असताना आता कळव्यातील जयभारत मैदानाच्या शेजारी असेलल्या अनधिकृत इमारतीच्या बांधकामावरून प्रशासन पुन्हा अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. अशाप्रकारची बांधकामे संपूर्ण कळवा प्रभाग समितीमध्येच होत असल्याने या बांधकामाना प्रशासनाचेच अभय आहे का? अशी चर्चा आता सर्वत्र सुरु आहे.

माजिवडे-मानपाडा प्रभाग हद्दीत पुलाखालील बांधकामे, बाळकुम पाडा क्र. ३, पानखंडा येथील अनधिकृत चाळी, इमारतींवर अनेक तक्रारीनंतरही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.