विलीनीकरणाची चर्चा अन् ठाण्यात आव्हाड-मुल्ला गळाभेट

ठाणे: पुणे-मुंबईसह राज्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असतानाच आज ठाण्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थिकलश दर्शन कार्यक्रमात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांनी संवाद साधत गळाभेट घेतली. त्यामुळे लवकरच दोन पक्ष एकत्र येतील, असा कयास कार्यकर्ते बांधू लागले आहेत.

एकमेकांकडे न पाहता निघून जाणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आ.डॉ जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाचे नजीब मुल्ला हे अजित पवार यांच्या अस्थीकलश दर्शनाच्या निमित्ताने एकत्र आले. दोघांनीही दादांबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू झाला होता. त्यांचा अस्थिकलश राज्यभर कार्यकर्त्यांच्या दर्शनासाठी नेण्यात येत असून सोमवारी तो राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात सर्व्हिस रोड येथे ठेवण्यात आला होता. आ. आव्हाड हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ठाणे शहर अध्यक्ष मनोज प्रधान यांच्यासह दर्शन घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यालयात गेले होते. दर्शन घेऊन झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आनंद परांजपे, नजीब मुल्ला यांनी कै. अजित पवार यांच्या आठवणीना उजाळा दिला. एकमेकांची गळाभेट देखिल यावेळी झाली.

राष्ट्रवादी पक्षाचे दोन हजार टक्के विलीनीकरण होणार होते, परंतु त्याबाबत मी काही बोलणार नाही. भविष्यात दोन राष्ट्रवादी एकत्र होण्याबाबतचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होईल किंवा नाही होणार त्याबाबत देखिल भाष्य करण्यास आ.आव्हाड यांनी नकार दिला. अजित पवार यांच्यासारखा तत्काळ निर्णय घेणारा नेता ४० वर्षांत पाहिला नाही. त्यांची प्रशासनावर मजबूत पकड होती. त्यांच्यासारखा नेता पुन्हा होणार नाही. त्यांच्या जाण्याने राज्याचे मोठे नुकसान झाल्याचे आ.आव्हाड म्हणाले.