भाजपाकडे येणार अर्थ, महसूल आणि गृह खाते?

खातेवाटप १२ जुलैनंतरच

मुंबई : राज्यात भाजप आणि शिवसेनेतील एकनाथ शिंदे गट यांची सत्ता स्थापन झाल्यानंतर राजकीय वर्तुळाला खातेवाटपाची उत्सुकता लागली आहे. येत्या काही दिवसांत होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात सर्वात महत्त्वाची खाती भाजपकडे राहील, अशी शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, अर्थ, महसूल आणि गृहखाते हे भाजपकडे राहील. तर एकनाथ शिंदे गटाला नगरविकास आणि (रस्ते विकास महामंडळ) खाती मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमध्ये ही दोन्ही खाती एकनाथ शिंदे यांच्याकडेही होती. मात्र, या दोन्ही खात्यांच्या कारभारात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून हस्तक्षेप होत असल्याने एकनाथ शिंदे नाराज होते. त्यामुळे आता भाजपसोबत सरकार चालवताना तरी एकनाथ शिंदे यांच्याकडे या दोन्ही खात्यांचे संपूर्ण नियंत्रण असेल का, हे पाहावे लागेल.

याशिवाय, एकनाथ शिंदे गटासोबत असणाऱ्या ३९ आमदारांपैकी कोणाला मंत्रिपदं मिळणार, याचीही उत्सुकता सर्वांना लागली आहे. ठाकरे सरकारमधील तब्बल आठ मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले होते. त्यामुळे या सगळ्यांना आपापली खाती परत मिळणार का, हे पाहावे लागेल. अर्थ, महसूल आणि गृह ही तिन्ही प्रमुख खाती भाजपकडे गेल्यास एकनाथ शिंदे गटाच्या वाट्यास काय येणार, हेदेखील पाहावे लागेल. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चेनुसार, एकनाथ शिंदे गटातील बहुतांश आमदारांना राज्यमंत्री पद आणि महामंडळे देऊन त्यांची योग्य ती सोय करण्यात येईल. एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी शिवसेना सोडून मोठा राजकीय धोका पत्करला आहे. त्यामुळे आपल्याला याचा योग्य तो मोबदला मिळावा, अशी या सर्व आमदारांची अपेक्षा आहे. तेव्हा आता प्रत्यक्षात या आमदारांच्या पदरी कोणती खाती पडणार, हे येत्या काही दिवसांमध्येच स्पष्ट होईल.

भाजपच्या कोट्यातून मनसे आमदार प्रमोद पाटील यांना मंत्रिपद?

कल्याण लोकसभा मतदार संघात काल परवापर्यंत खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीकेची एकही संधी न सोडणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीण मतदार संघाचे आमदार राजू पाटील यांनी शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या मंजुरीच्या बाजूने केलेले मतदान ठाणे जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरणांना जन्म देणारे ठरेल अशी शक्यता आहे. या नव्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजू पाटील आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात दिलजमाई झाल्याचं वृत्त असून मनसेला नव्या मंत्रीमंडळात स्थान मिळण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

मनसेचा एक आमदार असला तरी राज्यातील सत्ता नाट्य, विधान परिषद, राज्यसभा निवडणुकीसाठी मनसे आमदार प्रमोद पाटील यांनी अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेवरून विनाअट, संयमितपणे महत्वाची भूमिका बजावली. राज ठाकरे यांनी एका संपर्कातून फडणवीस यांना दिलेला सकारात्मक प्रतिसाद, हा ‘कनेक्ट’ यापुढील काळात कायम राहावा. सत्ता नाट्यात मनसेचा एक आमदार होता, तरीही मनसेला मंत्रिपद देण्यात आले, हाही संदेश मनसे कार्यकर्त्यांसह जनमानसात जावा हा भविष्यकालीन विचार करून भाजपच्या वरिष्ठांनी भाजप कोट्यातून मनसेला शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद देण्याची जोरदार तयारी चालविली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते.

कल्याण लोकसभा मतदार संघातील कळवा, मुंब्रा परिसर काँग्रेस, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. या भागात शिवसेनेला नेहमीच मतांमध्ये झटका बसतो. ही उणीव भरून काढण्यासाठी कल्याण ग्रामीणमधील नेहमीचा शिवसेनेचा मतदार आणि त्याला मनसेची साथ मिळाली तर कळवा, मुंब्रा भागाची उणीव या भागात भरून हा भाग ‘सेफ’ करायचा, असेही गणित सत्तेच्या सारीपाटातून जुळविले जात असल्याचे सुत्राने सांगितले.