एसटी कर्मचा-यांना कुणी उरला नाही वाली

पगार तुटपुंजा, संघटनाही सुस्त

ठाणे : एकीकडे तुटपुंज्या पगाराने एसटी कर्मचाऱ्यांची कंबर मोडली असताना मान्यताप्राप्त एस.टी कामगार संघटनाही पूर्वीसारख्या क्रियाशील राहिल्या नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कुणी वाली राहिला नसल्याची बाब ठाणे आगारातील कर्मचाऱ्यांशी बोलताना उघडकीस आली.

ठाण्यातील एस.टी महामंडळातील विविध कामगार संघटनांशी संलग्न असलेले निम्नश्रेणी कर्मचारी व अन्य कर्मचारी, वाहक आणि चालक, तंत्रज्ञ, निम्न श्रेणीतील अभियंते आदींशी चर्चा केली असता, त्यांच्यापैकी असंख्य कर्मचारी व कामगार, अधिकारी एसटीच्या गत आंदोलनाविषयी उघडपणे बोलण्यास तयार नव्हते. मात्र सद्यपरिस्थिती लवकर निवळू देत, अशी आशा कर्मचारी व्यक्त करत आहेत.
एसटी महामंडळाच्या यापूर्वीच्या काळात २२ हून अधिक कर्मचारी व कामगार संघटना १०० टक्के कार्यरत होत्या. कामगार, कर्मचारी विविध संघटनांद्वारे आपापले प्रश्न, अडचणी, दाद संबंधित अधिकारी आणि वरिष्ठ अधिका-यांसमोर मांडत होते. हे सर्व कर्मचारी व कामगार विविध संघटनांच्या पाठिंब्यावर त्यांचे ज्वलंत प्रश्न, वैयक्तिक बाबी वरिष्ठांसमोर मांडत होते. कधी चुटकीसरशी तर कधी विलंबाने का होईना त्यावर तोडगा निघत होता, अशी माहिती अनेक कर्मचारी व कामगारांनी दिली. आता मात्र या संघटना फारशा सक्रिय दिसत नसल्याने कर्मचारी निराधार दिसत आहेत.

वेतन फक्त १७ हजार ३२२ रुपये

राज्यभरात जाणा-या एसटीच्या शेकडो बस वाहक आणि चालकांना एस.टी चालवताना होणा-या विविध त्रासामुळे, अपु-या सोयीसुविधांना सामोरे जावे लागते. त्यांचे मूळ वेतन फक्त १२,०८० रुपये होते. आंदोलनानंतर त्यांना दिलेल्या वेतनवाढीचा दर फक्त २ ते ३ टक्के प्रमाणे अवघे २४२ रुपये झाले. ३१ ऑक्टोबर २०२१ रोजीचे त्यांचे वेतन अवघे १२,३२२ रुपये इतके ‘वाढले’ आहे. १ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रत्येक चालक आणि वाहकांचे सुधारित वेतन फक्त १७,३२२ रुपये झाले आहे.