अंतरिम अर्थसंकल्पाने घातला वाढत्या अर्थव्यवस्थेचा पाया

ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अध्यक्षा सुजाता सोपारकर यांचे प्रतिपादन

ठाणे : अंतरिम अर्थसंकल्प समृद्ध आणि सर्वसमावेशक असून भारत निर्माण करण्यासाठी तसेच अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करण्यासाठी पोषक आहे. विशेषतः गरीब, महिला,युवा आणि अन्नदात्याचे सक्षमीकरण आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यावर भर देणारा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात 2024 च्या विकसित भारताचे स्वप्न साकार होताना दिसत आहे.
केंद्र सरकारकडून विविध योजनांद्वारे सामाजिक चार स्तंभांच्या (गरीब, महिला, युवक आणि शेतकरी) उन्नतीवर भर दिला जात आहे ज्यामुळे तळागाळापर्यंत सर्वांगीण आणि सर्वसमावेशक वाढ होईल.
रूफटॉप सौरऊर्जाकरणामुळे सौर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील उद्योगाला चालना मिळेल तसेच गरीब लोकांच्या पैशांची देखील बचत होईल. एकाच वेळी ई-चार्जिंग नेटवर्कचा विकास आणि पायाभूत सुविधांमध्ये सततच्या भांडवल वृद्धीमुळे उद्योगाला चांगल्या ऑर्डर्स  मिळतील. मध्यमवर्गासाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत दोन कोटी नवीन घरे बांधण्याची सरकारची योजना असल्याने गृहनिर्माण क्षेत्रातही चांगली वाढ होईल, असे मत अध्यक्षा सुजाता सोपारकर यांनी व्यक्त केले.

2009-2010 पर्यंत रु. 25 हजारपर्यंतच्या आणि रु 10 हजारपर्यंतच्या 2010-11 ते 2014-15 ह्या आर्थिक वर्षापर्यंत आयकर खात्याच्या मागण्या रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने याचा 10 दशलक्ष लोकांना फायदा होईल आणि ते तणावमुक्त होतील, असा दावा सौ.सोपारकर यांनी दिला.

काही आयात अधिसूचनांची वैधता आणि स्टार्ट अप्सवरील प्रोत्साहन योजनेची मुदत मार्च 2025 पर्यंत वाढवल्याने सातत्य राखण्याच्या दृष्टीने एक चांगले पाऊल आहे. एकूणच अंतरिम अर्थसंकल्पाने वाढत्या अर्थव्यवस्थेचा पाया घातला असल्याचे स्पष्ट मत सौ.सोपारकर यांनी व्यक्त केले आहे.