ठाण्याचे शिक्षक दाम्पत्य भीषण अपघातात ठार

मालेगाव : मुंबईहून वडीलांच्या अंत्यविधीसाठी मालेगावी येत असताना मुंबई-आग्रा महामार्गावर वाके शिवारात उभ्या असलेल्या कंटेनरवर कार आदळल्याने झालेल्या अपघातात दोघी सख्ख्या बहिणी व जावयाचा मृत्यू झाल्याची हृदयदावक घटना घडली आहे. यातील एक महिला या ठाण्यातील श्रीरंग विद्यालयातील शिक्षिका तर त्यांचे पती मुलुंड येथील एका शाळेत शिक्षक होते. या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

गुरूवारी पहाटे हा भीषण अपघात घडला. या अपघातात एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

वाके शिवारात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनर (एमपी 09 एचआर 8322) ला पाठीमागून कारने जोरदार धडक दिली. या अपघातात मिनाक्षी हिरे (53) रा. टिटवाळा जिल्हा ठाणे, अनिशा सावंत (40) रा. ठाकुर्ली जिल्हा ठाणे, विकास सावंत (45) रा. ठाकुर्ली जिल्हा ठाणे या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर वैभवी जाधव (17) रा. नाशिक ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातात मृत्यू पावलेल्या अनिशा सावंत या ठाण्यातील श्रीरंग विद्यालयातील शिक्षिका असून त्यांचे पती विकास सावंत हे मुलुंड येथील शाळेत शिक्षक होते.

या अपघाताची माहिती तालुका पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेने ठाणे आणि ठाकुर्ली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.