ठाणे: मागील दोन आठवडे जोरदार फलंदाजी केल्यानंतर पाऊस पुढील पाच दिवस सुट्टीवर जाणार असल्याचे हवामान खात्याने आज जाहीर केले आहे.
ठाणे शहरात जूनच्या २३ तारखेला पावसाने सुरुवात केली होती. ८ जुलैपर्यंत ठाणे शहरात ९८६.१६ मिमी पावसाची नोंद झाली होती. मागील वर्षी ९८७.७४ मिमी पावसाची नोंद झाली होती. सखल भागात पाणी देखिल साचले होते, परंतु मागील दोन दिवस पाऊस तुरळक पडत आहे.
आज हवामान खात्याने १६ जुलैपर्यंत ठाणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे, त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने पेरण्या वाया गेल्या आहेत तर काही ठिकाणी लावणीकरिता भात तयार होत असतानाच पाऊस पुढील पाच दिवस पडणार नाही. त्यामुळे भात करपून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. जिल्ह्यातील धरणांमध्ये देखिल पुरेसा पाणीसाठा नाही. पावसाची अशीच स्थिती राहिली तर पुढील वर्षी पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘ठाणेवैभव’ला सांगितले.