राहुल नार्वेकरांनी अन्यायाचे नाव न्याय ठेवले – उद्धव ठाकरे

मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महापत्रकार परिषद घेऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रता प्रकरणात दिलेला निकाल कसा चुकीचा होता याबाबतचे दावे केले. त्यावेळी त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे प्रमुख नेते आणि कायदेतज्ज्ञ असिम सरोदे आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील रोहित शर्मा हे उपस्थित होते.

राहुल नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न करता त्याचा विश्वासघात केला, नार्वेकरांनी अन्यायाचं नाव हे न्याय ठेवलं आणि निकाल दिला असा घणाघाती आरोप ॲड. असिम सरोदे यांनी केला. विधीमंडळ पक्ष हा पाच वर्षांसाठी असतो, त्यामुळे मूळ पक्ष हाच महत्त्वाचा आहे असे सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही नार्वेकरांनी त्याचे पालन केले नाही आणि बहुमताच्या आधारे निर्णय दिल्याचे सांगितले. त्यामुळे नार्वेकरांचा निकाल हा लोकशाहीला मारक असल्याचेही ॲड. सरोदे म्हणाले.

गेल्या आठवड्यात लबाडाने नव्हे तर लवादाने एक निर्णय दिला, पण शिंदे आणि नार्वेकरांनी लोकांमध्ये यावं, मीही येतो, आणि त्यांना विचारावं की शिवसेना कुणाची? मग लोकांनी ठरवावं कुणाला तोडावं, लाथाडावं आणि कुणाला निवडावं असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर सडकून टीका केली. ही लढाई आता केवळ शिवसेनेची राहिली नाही तर ही सर्व देशाची लढाई आहे, लोकशाही जिवंत राहणार की नाही, सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार अस्तित्वात राहिल की नाही याची लढाई असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणाले की, फाशीचा निर्णय हा न्यायालय सुनावतं, पण त्याची अंमलबजावणी ही जल्लादाकडे दिली जाते. या कटाची अंमलबजावणी ही नार्वेकर नावाच्या जल्लादाकडे दिली होती. निवडणूक आयोग म्हणजे तर दिव्यच आहे. ज्या महाराष्ट्रात रामशास्त्री प्रभुणे जन्माला आले, संविधान लिहिलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, त्याच महाराष्ट्रातून विरोधी पक्षांना संपवण्याचं काम यांनी सुरू केलं. जेपी नड्डा यांनी या आधी देशात फक्त भाजप हा एकच पक्ष राहणार असं सांगितलं होतं. जर 1999 नंतर शिवेसनेची घटनाच अस्तित्वात नव्हती तर 2014 साली मला कशाला मोदींना पाठिंबा द्यायला पाठवलं होतं? 2019 साली कशाला सहीसाठी बोलावलं होतं? तिकडेच ढोकळ्यावाल्याची सही घ्यायची होती ना असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.