फक्त 29 रुपये किलोने मिळणार ‘भारत तांदूळ’

नवी दिल्ली: सर्वसामान्यांना स्वस्त दरात धान्य खरेदी करता यावं यासाठी केंद्र सरकारकडून ‘भारत’ ब्रँडच्या नावाने स्वस्त डाळ आणि स्वस्त पीठ विक्री सुरु आहे. स्वस्त डाळ आणि पिठानंतर आता सरकार तांदूळही स्वस्त दरात विकणार आहे.

सर्वसामान्यांसाठी सरकारने ‘भारत तांदूळ’ आणला आहे. या भारत तांदळाची विक्रीही पुढील मंगळवारपासून म्हणजेच 6 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होत आहे. भारत तांदळाची किंमत 29 रुपये प्रति किलो असेल. हा तांदूळ तुम्हाला कुठून आणि कसा खरेदी करता येईल, याबाबत जाणून घ्या.

गेल्या काही महिन्यांपासून तांदूळ, डाळी आणि पिठाच्या दरात मोठी वाढस झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडत आहे. सरकारने गहू, पीठ आणि स्वस्त तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध लादल्यापासून तांदूळ, डाळी आणि पीठ महागलं आहे. महागाईने त्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने भारत ब्रँड आणखी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता केंद्र सरकार भारत ब्रँड अंतर्गत ‘भारत तांदूळ’ बाजारात आणणार आहे. सरकारने भारत तांदूळ आणला असून पुढील आठवड्यापासून याची विक्री सरु होईल. 6 फेब्रुवारीपासून हा स्वस्त तांदूळ 29 रुपये किलो दराने विकला जाणार आहे. तसेच, सरकारने शुक्रवारी व्यापाऱ्यांना त्यांच्याकडील साठा जाहीर करण्याच्या सूचना दिल्या, जेणेकरून भाव नियंत्रणात राहता येतील.

केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी पत्रकार परिषदेत माहिती देत सांगितलं की, गेल्या एका वर्षात तांदळाच्या किरकोळ आणि घाऊक किमतीत सुमारे 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. निर्यातीवर बंदी असतानाही तांदळाच्या किमती वाढतच आहेत. त्यामुळे तांदळाच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने भारत तांदूळ बाजारात आणला आहे. भारत तांदूळ नाफेड आणि एनसीसीएफ सहकारी संस्थांमार्फत 29 रुपये प्रति किलो दराने बाजारात विकला जाईल. याशिवाय केंद्र भंडारच्या रिटेल चेनवरही भारत तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी म्हटलं की, भारत तांदूळ ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनही विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाईल. पुढील आठवड्यापासून याद ब्रँड 5 आणि 10 किलोच्या पॅकिंगमध्ये लोकांना उपलब्ध होईल. पहिल्या टप्प्यात सरकारने 5 लाख टन तांदूळ किरकोळ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आहे. महागाई आटोक्यात येईपर्यंत निर्यातबंदी संपवण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तांदूळ निर्यातीवरील बंदी तूर्तास कायम राहणार आहे.