नवी मुंबई: मागील काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे ३० टक्के ते ४० टक्के कांदा भिजला असून त्याचा दर्जावर परिणाम झाला आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजारात ७० टक्के ते ८० टक्के हलक्या प्रतीचा कांदा दाखल होत आहे. कांद्याचा दर्जा खालावत असल्याने दरांवर परिणाम होऊन दर घसरले आहेत. मंगळवारी घाऊक बाजारात कांदा प्रतिकिलो पाच ते १० रुपये दराने विक्री झाला.
गेल्या काही दिवसांपासून एपीएमसी बाजारात सातत्याने कांद्याच्या दरात घसरण होत आहे. पावसाळ्यात कांद्याचे दर वधारतात, त्यामुळे पावसाळ्याआधीच कांदे साठवणुकीला सुरुवात होते. कांद्याला चढे दर मिळतील या अपेक्षेने कांदा साठवणुकीला सुरुवात झाली आहे. मात्र यामध्ये सर्वात उच्चतम प्रतीच्या कांद्याची साठवणूक केली जात आहे.
सध्या बाजारात ७० टक्के ते ८० टक्के हलक्या प्रतीचा कांदा दाखल होत असून त्यातही अवकाळी पावसाने कांदे भिजल्याने ३० टक्के ते ४० टक्के कांदे खराब होत आहेत. त्यामुळे बाजारात हलक्या दर्जाचा कांदा दाखल होत आहे. मंगळवारी बाजारात कांद्याच्या १४९ गाड्या दाखल झाल्या आहेत. परंतु ग्राहक कमी असून शेतमालाला उठाव कमी आहे, त्यामुळे दर घसरले आहेत, असे मत व्यापारी मनोहर तोतलानी यांनी व्यक्त केले आहे.
मागील आठवड्यात उच्चतम प्रतीचा कांदा प्रतिकिलो ८ ते १२ रुपयांवर होता, तो आता ५ ते १० रुपये तर पाल्याचा कांदा ३ ते ५ रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे.