ठाण्याच्या कचऱ्याला कोणी देईना थारा!

ठामपाच्या आतकोली येथील घनकचरा प्रकल्पाला विरोध

भिवंडी: भिवंडीतील पडघ्याजवळील आतकोली येथील ठाणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला परिसरातील नागरिकांनी कडाडून विरोध केला आहे.

आतकोलीतील ८४ एकर गुरचरण जमिनीवर ठाणे महापालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ठाणे शहरातील कचरा येथे आणून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. त्याबाबत पोलिस प्रशासनाच्या मध्यस्थीने ठाणे महापालिका अधिकारी व परिसरातील नागरिकांची समन्वय सभा गुरुवारी (ता. १७) पडघा येथील ग्रामसचिवालय सभागृहात घेण्यात आली.

ठाणे शहरातील कचरा येथे आणून एका टप्प्यात कचऱ्याचे वर्गीकरण व दुसऱ्या टप्प्यात हरीत कोळसानिर्मित प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे, तर या प्रकल्पाशेजारीच गावे, घरे, शेती आहेत. जवळच क्रीडांगण ठाणे ग्रामीणचे पोलिस मुख्यालय, वसाहत, जेलसाठी जमीन प्रस्तावित केली आहे. जवळच नदी, पिसे डॅम आहे, या घनकचरा प्रकल्पामुळे परिसरात त्यांचे प्रदूषण, दुष्परिणाम दिसणार आहे. हजारो एकर जमिनींवरील विकास खुंटणार असल्याचे शिवसेना उपनेते प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, समाजसेवक भगवान सांबरे यांनी सांगितले; तर या प्रकल्पाव्यतिरिक्त दुसरा कुठलाही प्रकल्प आल्यास त्याला सहकार्य करण्याचे आश्वासन स्थानिकांनी दिले.

आचारसंहिता काळात पोलिस बंदोबस्तात घनकचरा आणण्यास ठाणे महापालिकेने सुरुवात केल्यास विरोध करणार असल्याचा इशारा स्थानिक शेतकरी रमेश शेलार व उपस्थित नागरिकांनी दिला. या वेळी उपस्थित अप्पर पोलिस अधीक्षक भारत तांडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी ठाणे महापालिकेचे उपायुक्त जोशी, स्थानिक गुन्हे शाखेचे सुरेश मनोरे, पडघा पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्यासह परिसरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.