नवी मुंबई: जन्मू आणि काश्मीर तसेच हिमाचल प्रदेशात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे देशी सफरचंदाच्या उत्पादनावर परिणाम होणार असल्याने हे सफरचंद उशिरा दाखल होणार आहेत.
एपीएमसी फळ बाजारात वर्षभर परदेशी सफरचंद आणि पेर दाखल होतात. मात्र जुलै ते सप्टेंबर दरम्यान देशी सफरचंदांचा हंगाम सुरू होत असतो. यंदा तापमान वाढीमुळे आधीच हंगामला विलंब झाला असून आता उत्तर भारतात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे हंगाम आणखी लांबणार असल्याची माहिती येथील व्यापाऱ्यांनी दिली आहे.
वाशीतील एपीएमसी फळ बाजारात उत्तर भारतातील शिमला, हिमाचल प्रदेश आदी ठिकाणांहून सफरचंद, पेर दाखल होतात. यंदा मात्र त्या ठिकाणीही तापमानात वाढ झाली होती. त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर हंगामही लांबणीवर गेला आहे. जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कहर केला आहे. विविध भागात भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत. रस्ते वाहतूक कधीपर्यंत पूर्ण होईल याची शाश्वती नाही. त्यामुळे हंगामाला आणखीन विलंब होण्याची शक्यता आहे,असे मत फळ व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.