* गाळे, घरे, टपऱ्या निष्कासित
* बाधित रहिवाशांचे भाईंदरपाडा येथे पुनर्वसन
ठाणे: नागलाबंदर खाडी किनारा विकसित करण्याचा निर्णय झाल्यानंतर येथील जागेला सोन्याचा भाव आला आहे. या पार्श्वभूमीवर भूमाफियांनी या परिसरात अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात केली आहेत. विकासातील हे अडथळे दूर करण्याचा निर्णय घेत आज हाती घेतलेल्या मोहिमेत गाळे, घरे आणि टपऱ्या उद्ध्वस्त करण्यात आल्या.
ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील घोडबंदर येथे नागलाबंदर खाडी किनारा विकसित करण्यात येत असून शासनाच्या निधीअंतर्गत आरमार केंद्र प्रतिकृतीचे बांधकाम प्रस्तावित आहे. या पार्श्वभूमीवर नागलाबंदर खाडी किनारी परिसरात अनधिकृतपणे उभारण्यात आलेले वाणिज्य गाळे, निवासी घरे तसेच टपऱ्या आदी पूर्णपणे निष्कसित करण्याची कारवाई महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागामार्फत करण्यात आली.
ही कारवाई प्रस्तावित करण्यापूर्वी या ठिकाणी अनधिकृतपणे निवासी घरात वास्तव्य करीत असलेल्या रहिवाशांचे पुनर्वसन भाईंदरपाडा येथील महापालिकेच्या सदनिकेमध्ये करण्यात आले. तसेच या ठिकाणी असलेली अनधिकृत बांधकामे संपूर्णपणे निष्कसित करण्याची कारवाई करण्यात आली. ही कारवाई उपायुक्त शंकर पाटोळे, माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त सोनल काळे, कार्यकारी अभियंता महेश अमृतकर, एमएसएफचे जवान आणि पोलिसांच्या बंदोबस्तात करण्यात आली.