आ. किणीकर आणि शिवसेना महिला आघाडी आमने-सामने

अंबरनाथ नगरपालिकेत कार्यकर्त्यांचा गोंधळ

अंबरनाथ : शिवसेनेचे बंडखोर आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि अंबरनाथमधील शिवसेनेची महिला आघाडी आज अंबरनाथ नगरपालिकेच्या मुख्यालयात आमने-सामने आले. यावेळी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी आमदार डॉ. किणीकर यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केल्याने  नगरपालिका मुख्यालयात एकच गोंधळ उडाला.

अंबरनाथमध्ये नव्याने मंजूर झालेल्या विविध विकास कामांबाबत माहिती देण्यासाठी आमदार डॉ. किणीकर यांनी नगरपालिका कार्यालयात आज बुधवार (६) जुलै रोजी पत्रकार परिषद आयोजित केली होती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी नगराध्यक्षा, माजी नगरसेवक आदींच्या प्रयत्नातून विकास कामे झाली आहेत, असे आमदार डॉ. किणीकर म्हणाले.

आमदार डॉ. किणीकर यांची पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वीच शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यानी  अंबरनाथ नगरपालिकेवर धडक मारली होती. शहरातील शौचालयांची  दुरावस्था, विविध ठिकाणी तुंबणारे पाणी, औषध फवारणी आणि नळाद्वारे येणारे पिण्याचे गढूळ पाणी या समस्या घेऊन माजी नगराध्यक्षा मनिषा वाळेकर, महिला.संघटक नीता परदेशी, मालती पवार, चंदा गान  तसेच महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी अंबरनाथ नगरपालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांच्या कार्यालयात ठाण मांडले.

शहरातील प्रश्न घेऊन महिला नगरपालिकेत आल्या असताना आमदार डॉ. किणीकर आणि मुख्याधिकाऱ्यांनी दुसऱ्या दालनात पत्रकार परिषद सुरु करून माहिती दिली. मुख्याधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलो असताना दुसऱ्या सभागृहात पत्रकार परिषद कसे घेऊ शकतात, असा सवाल उपस्थित करत महिलांनी आमदारांना विरोध केला. शहरातील समस्यांबाबत मला सांगितले असते तर मीही आलो असतो, असे आमदार डॉ. किणीकर यावेळी म्हणाले.

नगरपालिकेचे मुख्याधिकारी कार्यालयात येत नाहीत तोपर्यंत येथून जाणार नाही अशी भूमिका आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. त्याचवेळी पालिकेच्या दुसऱ्या सभागृहात आमदार डॉ. बालाजी किणीकर, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ आणि पालिका अभियंत्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद सुरू झाली. यावेळी शहरात मंजूर झालेल्या दोन रस्त्यांच्या कामाची माहिती देण्यात आली. पत्रकार परिषद संपेपर्यंत या महिला कार्यालयात होत्या. पत्रकार परिषद संपवून आमदार डॉ. किणीकर सभागृहाबाहेर येताच शिवसेनेच्या महिला आघाडीच्या सदस्यांनी त्यांना गराडा घातला. आम्ही शहरातील समस्या घेऊन पालिकेत असताना आपण पत्रकार परिषद घेता, असा सवाल महिला कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. तर यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्याविरोधात महिलांनी नाराजी व्यक्त केली. अनुचित प्रकार घडू नये म्हणून नगरपालिका कार्यालयात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.

निधी नसल्याचे कारण नको

खा. डॉ. शिंदे यांच्या सहकार्यातून शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पूर्व आणि पश्चिम दिशेकडे विकास आराखड्यातील  रस्ते तयार करण्यासाठी १० कोटी ७५ लाख रुपये आणि उंच इमारतींना अग्निसुरक्षा पुरवणारी यंत्रणा उपलब्ध होण्यासाठी शासनाकडून साडेचार कोटी असा १४ कोटी ५० लाखांचा  निधी मंजूर झाला आहे. आता कामे झालीच पाहिजेत, ती कधी करणार, असा सवाल आमदार डॉ. किणीकर यांनी मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांना  विचारला. सर्व तांत्रिक बाजूंची पूर्तता करून येत्या दोन महिन्यात कामे मार्गी लागतील, असे मुख्याधिकारी डॉ. रसाळ म्हणाले.