मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याशिवाय मविआ निवडणुकीला जाणार सामोरी

मुंबई: विधानसभा निवडणुकीला तीनही पक्षांनी एकत्रितपणे सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच निवडणुकीआधी मविआकडून मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा जाहीर केला जाणार नसल्याचीही माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

राज्यातील काँग्रेस नेत्यांची काल नवी दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस नेतृत्वाकडून आपल्याला आगामी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवायची असल्याचे राज्यातील नेत्यांना सांगण्यात आले. तसेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडणुकीआधी ठरवला जाणार नसल्याचे सांगण्यात आल्याचे समजते.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मिळालेल्या दमदार यशानंतर काँग्रेसने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मंगळवारी दिल्लीत राज्यातील काँग्रेस नेत्यांची वरिष्ठांसोबत बैठक पार पडली. आगामी निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढल्या जातील असे या बैठकीत ठरले आहे. त्यानुसार लवकरच मित्रपक्षांसोबत समन्वयासाठी एक समिती बनवा आणि संयुक्त रणनीतीवर काम करा, अशा सूचना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना दिल्या आहेत.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह पक्षातील इतर नेते आणि काही नवनियुक्त खासदारही सहभागी होते. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. त्यात मविआतूनच निवडणूक लढवण्यावर काँग्रेस नेतृत्व आग्रही होते. त्याशिवाय माध्यमांसमोर कुठलीही भूमिका मांडताना एका पक्षाची नको तर महाविकास आघाडीची भूमिका असावी असंही नेत्यांना सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रात आम्ही लोकसभा प्रतिकुल परिस्थितीत लढल्या. जनतेने मविआला पाठिंबा दिला. महाराष्ट्राला देशातील विकसित आणि समृ्द्ध राज्य बनवायचे आहे. परंतु भाजपा सरकारने लोकांना महागाई आणि बेरोजगारीच्या संकटात टाकले. राज्यातील शेतकऱ्यांवर सर्वात जास्त अन्याय झाला. देशात परिवर्तनाचे चित्र आहे. महाराष्ट्राने याचे स्पष्ट संकेत दिले. आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी म्हटले आहे.

सूत्रांनुसार, पक्षाच्या बैठकीत काँग्रेसच्या काही नेत्यांनी ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीबाबत तक्रारी मांडल्या आणि नाराजी जाहीर केली. परंतु यावर फारसे लक्ष न देता पुढे चर्चा करू असं काँग्रेस नेतृत्वामे म्हटले. भाजपाला हरवणे हे आपल्या सगळ्यांचे प्राधान्य आहे, अशा सूचना राहुल गांधींनी नेत्यांना केल्या.