कोकण, साताऱ्यासह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी

शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

मुंबई: कोकणात मान्सून पूर्व पावसाने जोर धरला आहे. तर उर्वरित राज्यामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुढील काही तासांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अहमदनगर, जळगाव, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, मान्सून अंदमान निकोबार बेटांवर दाखल झाला आहे, ही एक आनंदाची बातमी आहे. मान्सूनची चाहूल लागली असून देशात मान्सून लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून दाखल होईल, असा अंदाज आहे.

मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झाल्यानंतर आता पुढे सरकण्यास सुरुवात झाली आहे. 24 तासांत दक्षिण-पूर्व अरबी समुद्रासह मालदीवच्या काही भागात मान्सूनचा प्रभाव जाणवू शकतो. दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान आणि निकोबार बेटांतील काही भागांमध्ये नैऋत्य मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्यामुळे अनेक राज्यांमध्ये पावसाचं वातावरण तयार झाले आहे.

कोयना परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सातारा जिल्ह्यातल्या पाटणमध्येही मुसळधार पाऊस कोसळत आहे. विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळत आहे. वादळी वाऱ्यामुळे पाटण आरल गावांमधील आठ घरांचे पत्रे उडाले आहे. त्याशिवाय शेतीचेही मोठं नुकसान झालेय. पाच दिवसापासून पाटणमध्ये सायंकाळच्या वेळेस वारे आणि मुसळधार पाऊस कोसळत आहे. नुकसानग्रस्तांना मदतीची मागणी स्थानिकांनी केली आहे.

मान्सूनपूर्व पावसामुळे कोकणातल्या ग्रामीण भागात जनजीवनावर काहीसा परिणाम झालेला दिसून येत आहे. विशेषतः बागायती शेतीला याचा फटका बसला आहे. दरम्यान अंदमानत दाखल झालेला मान्सून पुढील दोन दिवसांमध्ये अरबी समुद्रात दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तळकोकणात सर्वत्र मान्सून पूर्व पाऊस सुरु आहे. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, वैभवाडीत मान्सून पूर्व पाऊस सुरु आहे. मान्सून पूर्व पावासामुळे शेतकऱ्यांची काम खोळबली आहेत.

कोकणात मान्सून पूर्व पाऊस सुरू झाला आहे. परिणामी सध्या वातावरणात झालेला बदल पाहता किनारे भागात वाऱ्याचा वेग काहीसा वाढला आहे. सिंधुदुर्गात गेले आठ दिवस सतत मान्सूनपूर्व पाऊस कोसळतोय. यामुळे जिल्यातील आंबा आणि जाभूळ पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुळात यावर्षी जाभूळ पीक अत्यल्प प्रमाणात आले होते. त्यात मान्सून पूर्व पावसाने जांभूळ पीक शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोकणातील सर्वात मोठ्या जांभूळ बाजारपेठेत जांभूळ नावालाही दिसत नाही. त्यामुळे जांभूळ पीक मान्सून पूर्व पावसामुळे अडचणीत आले आहे.

चिपळूणमधील ग्रामीण भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. सावर्डे आणि सह्याद्री भागात पावसाचा जोर जास्त आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे आंबा बागायतदाराचे मोठे नुकसान झाले. चिपळूणमध्ये अनेक भागात वाऱ्यामुळे विजेचा पुरवठा खंडित झालाय. मागील पाच दिवसात झालेल्या पावसात वादळ आणि मुसळधार पावसामुळे झालेल्या पडझडीत 30 लाखांहून अधिकचे नुकसान झाले आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी. हवेत गारवा पण आंबा बागायतदार चितेंत आहेत.

सोलापूर जिल्हा आणि पुण्यातील इंदापूर तालुक्यात जोरादर वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उजनी येथे सुरु असलेल्या मदतकार्यात अडथळा आला. उजनीच्या पाणलोट क्षेत्रात भीमा नदीत सहा जण बुडाले त्याला आता तब्बल २२ तास उलटून गेले आहेत. अद्यापपर्यंत त्यांचा शोध न लागल्याने स्थानिकांचा संयम सुटू लागला. तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी बोटीतून पाण्यात जावून जी पाहणी केली त्याला ही नागरिकांकडून आता विरोध होत आहे. त्यामुळे बोटीतून पाहणी करण्यापेक्षा मनुष्यबळ वाढवा, अशी मागणी स्थानिकांनी केली.