अजित पवार विरोधी बाकावरून सत्ताधाऱ्यांची काळजी घ्यायचे

जितेन्द्र आव्हाड यांची जोरदार टीका

ठाणे : अजित पवार हे विरोधी बाकावर होते, तेव्हा त्यांनी नेहमी सत्ताधारी अडचणीत येणार नाहीत याची काळजी घेतली असे सांगतानाच अजित पवार असेच बोलत राहिले तर ‘बात बहुत दूर तक जाएगी’ असा इशारा राष्ट्रवादी (शरद पवार) नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

अजित पवार सातत्याने शरद पवार यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. ते असेच बोलत राहिल्यास माझ्याकडेही सांगण्यासारखे खूप आहे, त्यामुळे शांत रहा अन्यथा “बात दूर तक जायेगी” असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील पत्रकार परिषदेतून अजित पवार यांना दिला आहे.

अजित पवार यांनी नेहमीच ओबीसी आणि एसटी यांचा निधी थांबवण्याचे काम केले. जातीयवाद पाळणारा कोणता मंत्री असेल तर ते अजित पवार आहेत अशी टीकाही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली. शरद पवार नसते तर तुम्ही कुठे असता? तुमचे कर्तृत्व काय? प्रफुल पटेल, छगन भुजबळ यांच्याशी तुमचे कसे सुमधुर संबंध होते? आम्हाला माहित नाही का? पण उगाच शरद पवारांना डिवचू नका अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

मी एकदा सिडकोचे प्रकरण काढले होते, तेव्हा संपूर्ण सत्ताधारी अडचणीत येणार होते. परंतु तेव्हा अजित पवार यांनी चकार शब्दही काढला नाही, तुम्ही कोणाकोणाच्या आणि कशा सुपाऱ्या वाजवायचे हे आम्हाला चांगलेच ठाऊक असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.