अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीने पाच लाखांची अनामत काढली? पाच महिन्यानंतरही आरोपी मोकाट

ठाणे: महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील तीन अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून महापालिकेच्या लेखा विभागाकडून पाच लाख १० हजार २५१ रुपये सुरक्षा अनामत रक्कम काढून घेतल्याप्रकरणी तिघा आरोपींविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून संबंधित ठेकेदार कंपनीला तत्काळ काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली आहे.

महापालिकेने २०१७ मध्ये वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातील विविध शौचालयांची दुरुस्ती करणे या कामाचा जान्हवी कन्स्ट्रक्शनचे मालक संजय घोसाळकर यांना एक कोटी ७७ लाख ५२ हजार रुपयांचा ठेका दिला होता. या ठेकेदाराची महापालिकेत पाच लाख १० हजार २५१ रुपये अनामत रक्कम जमा होती. संबंधित रक्कम काढून घेण्यासाठी महापालिकेचे कनिष्ठ अभियंता सुधीर सोनवणे, उप अभियंता शैलेंद्र चारी आणि कार्यकारी अभियंता प्रकाश खडतरे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून आणि ठेकेदाराकडील मूळ पावती सादर करून पैसे कंत्राटदाराच्या खात्यात जमा करण्यात आले होते. या स्वाक्षऱ्या अजित सिंग, अभिषेक सिंग आणि संतोष पवार यांनी केल्याचे महापालिकेच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे, याकडे माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी महापालिका आयुक्तांचे निवेदनात लक्ष वेधले आहे.

या प्रकरणी भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या १२ मे २०२३ रोजी तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणाची महापालिकेने चौकशी केली. त्यावेळी तीन अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरी करून अनामत रक्कम जमा करून घेण्यात आल्याचे सिद्ध झाले.

या संदर्भात वर्तकनगर प्रभाग समितीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने १७ मे २०२३ रोजी नगर अभियंता यांच्या कार्यालयाकडे अहवाल पाठविला. तसेच जान्हवी कन्स्ट्रक्शनचे मालक संजय घोसाळकर यांना ११ सप्टेंबर २०२३ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. तर संबंधित तीन अधिकाऱ्यांनी २ ऑगस्ट रोजी संबंधितांविरोधात लेखा विभागाकडून कारवाई करण्याची विनंती केली होती. मात्र, लेखा व वित्त विभागाने १७ ऑगस्ट रोजी बनावट स्वाक्षऱ्या झालेल्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर तक्रार दाखल करण्याची सुचविले आहे. या प्रकरणी पाच महिन्यानंतरही महापालिकेकडून कारवाई झालेली नाही, असे श्री. वाघुले यांनी निवेदनात म्हटले आहे. तसेच जान्हवी कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक संजय घोसाळकर, बनावट स्वाक्षऱ्या करणारे अजित सिंग, अभिषेक सिंग आणि संतोष पवार यांच्याविरोधात ठोस कारवाई करण्याची मागणी ठाणे शहर भाजपाच्या वतीने करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.