भारतामध्ये दर चार मिनिटाला मेंदू विकारामुळे एकाचा मृत्यू

ठाणे : जागतिक आकडेवारीनुसार ब्रेन स्ट्रोक या आजारामुळे मृत्यूंची संख्या वाढत आहे. ब्रेन स्ट्रोक हे भारतातील मृत्यूचे दुसरे सर्वात मोठे कारण असून भारतात दरवर्षी सुमारे दोन लाखांहून अधिक नागरिकांना ब्रेन स्ट्रोक होतात. म्हणजेच दर ४० सेकंदाला एका व्यक्तीला ब्रेन स्ट्रोक होत असून आणि दर चार मिनिटांनी स्ट्रोकमुळे एका नागरिकाचा मृत्यू होत आहे.

ग्लोबल बर्डन ऑफ डिजिजेसच्या २०१० च्या आकडेवारीनुसार १०० पैके ३१ रुग्ण हे २० वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत तसेच भारतामध्ये कमी वयात ब्रेनस्ट्रोक येण्याचे प्रमाण हे वाढत आहे. लॅन्सेट ग्लोबल हेल्थच्या आकडेवारीनुसार ब्रेनस्ट्रोकमुळे २०१९ मध्ये भारतात सहा लाख नव्याणव हजार मृत्यू झाले, जे एकूण मृत्यूच्या ७.४ टक्के होते.

याविषयी अधिक माहिती देताना ठाणे येथिल सोलारीस हॉस्पिटलचे संचालक व मेंदूविकार तज्ञ व शल्यचिकित्सक डॉ. अमित ऐवळे म्हणाले,” स्ट्रोक तेव्हा होतो जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या किंवा प्लेक्सच्या स्वरूपात चरबी जमा होते. त्यामुळे मेंदूला होणारा रक्तप्रवाह कमी होतो अथवा पूर्णपणे बंद होतो. या गुठळ्या रक्तातील ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा प्रवाह रोखते ज्यामुळे मेंदूच्या पेशी काही मिनिटांतच मृत पावतात. स्ट्रोकमध्ये दोन प्रकार असून पहिला प्रकार हा सौम्य स्ट्रोक तर दुसऱ्या प्रकाराला स्ट्रोक असे संबोधले जाते. पहिल्या प्रकारात रक्तप्रवाह काही वेळासाठी थांबतो त्यामुळे मेंदूवर कायमस्वरूपी प्रभाव पडत नाही परंतु त्याची लक्षणे इतर स्ट्रोक सारखीच असतात आणि अनेकदा येऊ घातलेल्या मोठ्या स्ट्रोकची ती पहिली पायरी असते त्यामुळे लगेचच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे तर दुसऱ्या प्रकारात मेंदूला कायमचे नुकसान होऊ शकते आणि दीर्घकालीन अपंगत्व येऊ शकते हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. म्हणून, स्ट्रोकच्या सर्व लक्षणांबद्दल जागरूक असणे आवश्यक आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे वेळ न दवडता मेंदुविकार तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे, अनेकवेळा स्ट्रोक आल्यानंतर १५-१६ तासांनी रुग्ण डॉक्टरकडे पोहचतो कधीकधी तर दोन ते तीन दिवसांनी उपचार सुरु करतात, यामुळे अनेक रुग्णांना कायमचे अपंगत्व येते व त्याचा त्रास त्या रुग्णाच्या नातेवाईकांना सोसायला लागतो यामुळे अनेक रुग्ण हताश होऊन आत्महत्या करतात.”
मेंदूला हानी झाल्याची लक्षणे म्हणजे वारंवार चक्कर येणे, शरीराचे असंतुलन आणि समन्वय कमी होणे हो चालणे, बसणे, हालचाल करणे कठीण होणे तसेच अचानक आंशिक किंवा पूर्ण दृष्टी कमी होणे हि स्ट्रोकची ठळक लक्षणे आहेत.

स्ट्रोक टाळण्यासाठी उपाय काय?
दारू व तंबाखूचे सेवन टाळा
नियमित व्यायाम करा
आहार संतुलित ठेवा.
सॅच्युरेटेड फॅट, मीठ, ट्रान्स फॅट आणि उच्च कोलेस्टेरॉल असलेले पदार्थ टाळा.भरपूर फळे व भाज्यांचा आहारात समावेश करा.