आगरी-कोळी संस्कृती भवनाचा उद्देश भरकटला?

* शासकीय कार्यक्रमासाठी अधिक वापर
* अखिल आगरी कोळी प्रबोधन ट्रस्टची हरकत

नवी मुंबई : शहरातील मूळ निवासी आगरी-कोळी बांधवांच्या संस्कृतीचे जतन करण्याच्या दृष्टीने सिडकोच्या माध्यमातून पामबीच मार्गावर नेरुळ येथे भव्य आगरी-कोळी भवन उभारण्यात आले आहे; परंतु या वास्तूचा वापर शासकीय कार्यक्रमांसाठी अधिक होत असल्याने इथल्या स्थानिक आगरी कोळी समाजाला हक्काच्या वास्तूचा वापर करता येत नसल्याची खंत अखिल आगरी कोळी प्रबोधन ट्रस्टच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

नवी मुंबईत शहरीकरणामुळे येथील मूळ संस्कृती लोप पावली आहे. यासंदर्भात प्रकल्पग्रस्तांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सिडकोने १३ वर्षांपूर्वी नेरुळ येथे आगरी-कोळी भवन बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २०११ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या भवनचे शानदार उद्घाटन करण्यात आले. या भवनामुळे आगरी-कोळी समाजाची मूळ संस्कृतीची शहरवासीयांना ओळख राहील, हा यामागचा उद्दात हेतू होता. भवनाची वास्तू सुबक व आकर्षक असली तरी तिच्यामध्ये बहुतांश कार्यक्रम हे शासकीय तसेच निवडणुकांसंदर्भात घेतले जातात. त्यामुळे इथल्या आगरी कोळी समाजाला आपले कार्यक्रम खाजगी हॉलमध्ये घ्यावे लागतात. त्यासाठी त्यांना अधिकचा आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे.

या वास्तूसाठी आगरी-कोळी समाज व ट्रस्टकडून सिडकोकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानंतर ही वास्तू उभी राहिली. परंतु शासनाच्या निवडणूक तसेच अन्य कार्यक्रमांसाठी या वास्तूचा सातत्याने वापर होत असल्याने शासनाच्या कार्यक्रमांच्या कालावधीत येथील भूमीपुत्रांना दुसऱ्या पर्यायी जागेचा मार्ग शोधावा लागत असून यासाठी फार मोठा भुर्दंड येथील भुमिपुत्रांना मोजावा लागत आहे.

कोरोना काळात कोव्हीड सेंटर सुरु करण्यात आले होते. त्यामुळे ते दोन वर्षे बंद ठेवण्यात आले होते. नवी मुंबई महानगरपालिका व सिडको, महाराष्ट्र शासनाच्या शेकडो वास्तू असताना भूमीपुत्रांच्या या एकाच वास्तूत शासनाचे सातत्यपूर्ण कार्यक्रम घेण्याचे प्रयोजन का केले जाते, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. ही वास्तू निवडणूक प्रक्रियेसाठी वापरू नये, त्यासाठी इतरत्र कुठल्याही वास्तूचा वापर करावा, अशी मागणी ट्रस्टकडून करण्यात आली आहे.