गणित, विज्ञानात ३५ पेक्षा कमी गुण मिळूनही अकरावीला प्रवेश

दहावीची परीक्षा आता आणखी सोपी!

मुंबई : एसएससी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात दहावीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाचा बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यानुसार गणित आणि विज्ञान या विषयात ३५ गुणांपेक्षा कमी आणि २० गुणांपेक्षा अधिक गुण असल्यास अकरावीला प्रवेश घेता येणार आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) तयार केलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या मसुद्याला राज्य शासनाने नियुक्त केलेल्या सुकाणू समितीने अंतिम मान्यता दिली आहे. हा आराखडा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्य मंडळातर्फे दहावीची परीक्षा घेण्यात येते. प्रचलित पद्धतीनुसार दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी सर्व विषयांत किमान ३५ गुण मिळवावे लागतात. मात्र अनेकांना गणित, विज्ञान विषयांची भीती वाटते. त्या दडपणाखाली अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात. त्यांना सत्र कायम ठेवण्याची मुभा (एटीकेटी) असल्याने अकरावीला प्रवेश मिळतो. पण, पुरवणी परीक्षा देऊन अनुत्तीर्ण विषयांत उत्तीर्ण व्हावे लागते.

आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार होणाऱ्या बदलानुसार दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्याने गणित आणि विज्ञान या विषयांत ३५ पेक्षा कमी आणि २०पेक्षा जास्त गुण मिळवल्यास त्या विद्यार्थ्याला अकरावीला प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, पुढील शिक्षणात गणित किंवा विज्ञान किंवा दोन्ही विषयांवर आधारित विषय घेता येणार नाहीत असा शेरा गुणपत्रिकेवर नमूद केला जाईल. तसेच गणित, विज्ञान या विषयांतील अभ्यासक्रम घ्यायचे असल्यास विद्यार्थ्याला पुरवणी परीक्षेत त्या विषयांत उत्तीर्ण व्हावे लागणार आहे.