तीन वर्षांच्या मुलाचे अपहरण

पालघर: पालघर जिल्हातील वसई पोलिसांच्या हद्दीत एका ३ वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्याऱ्या महिलेला वसई पोलिसांनी चार तासांत अटक करुन मुलाची सुखरूप सुटका केल्याची माहिती समोर येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, वसई येथील गवराइपाडा गावात राहणाऱ्या एका महिलेने वालीव पोलिस ठाण्यात येऊन सांगतले की, त्यांच्या तीन वर्षांच्या मुलाचे १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता कोणीतरी अपहरण केले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ दोन पथके तयार करून वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराज रणवरे यांनी तपास करण्याचे निर्देश दिले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप आणि त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि तांत्रिक व मानवी तपास यंत्रणाद्वारे एका संशयित महिलेचा शोध घेत बांद्रा रेल्वे टर्मिनस गाठले. त्या ठिकाणाहून सदर महिला सबरिन मोहम्मद अली शेखला ताब्यात घेतले. तिची विचारपूस केली असता ती काहीच सांगण्यास तयार नव्हती. पोलिसांनी अधिक कठोरपणे चौकशी केली असता त्यांच्या सांगण्यानुसार पोलिसांनी जिथे तिने मुलाला लपवुन ठेवले होते तिथे जाऊन त्या बालकाची सुखरूप सुटका केली. सबरिन मोहम्मद अली शेखला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पंडित म्हस्के, विश्वासराव बाबर, पोलीस उपनिरीक्षक किरण कुमार ठोंबरे, दीपक कुमार, आशुतोष चव्हाण, कर्मचारी सचिन दोरकर, मनोज मोरे, किरण म्हात्रे,महिला पोलिस कर्मचारी ममता पाटिल आणि दिपाली मसालनी यांनी केली.