कारवर ट्रक पलटी होऊन एक ठार

भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीतून निसटण्याच्या प्रयत्नात असलेला ट्रक एका कारवर पलटी झाल्याने कारमधील एक जण जागीच मयत झाला असून कार चालकासह पाचजण जखमी झाले आहेत.

नितीन भगत (३५) असे मृत्यू पावलेल्या इसमाचे नाव असून तो आपल्या सहकाऱ्यांसह रात्री साडे अकरा वाजता मुंबईस चालला होता. त्यांची कार भिवंडी तालुक्यातील माणकोली येथील कसबा ढाबा येथे आली असता मुंबईहून नाशिकमार्गे जाणारा ट्रक (क्र.केए ०१/केएन ११७७) हा कारवर पलटी झाला. या अपघातात नितीन भगत यांचा मृत्यू झाला तर कारमधील चालक देवराज तांबे, ओंकार राव, वैष्णव एरंडे, ओंकार पवार आणि भरत बलोटे हे पाचजण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी मुंबईत दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी ट्रकचालक लोकेश सिध्दलिंगप्पा यांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्यास पोलिसांनी अटक केली आहे. ट्रकचालक दारू प्यायला असल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.