कल्याण : मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकबाकी असलेल्या नागरीकांसाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने १४ डिसेंबर २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत अभय योजना २०२४-२०२५ जाहिर केली होती. त्यास नागरीकांकडून चांगला प्रतिसाद मिळालेला आहे.
या कालावधीत एकूण ३३,७१९ थकीत करदात्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून, एकूण २६४ कोटी रुपये वसूल झाले आहेत तर कर वसुलीपोटी ५०२ कोटी इतकी रक्कम जमा झालेली आहे.
थकीत मालमत्ताधारकांनी मालमत्ता कराचा भरणा तातडीने व वेळेत करावा अन्यथा कराचा भरणा करण्यास टाळाटाळ मिळकतधारकांची नळजोडणी खंडीत करणे, मालमत्ता जप्ती करणे, अटकावणी करणे, मिळकतीचा लिलाव करणे यासारखी कठोर कारवाई महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे. मोठी थकबाकी असलेल्या मिळकतधारकांना महानगरपालिकेने वेळोवेळी दिलेल्या नोटीसीला प्रतिसाद न दिलेल्या मिळकतींची जप्ती करण्यात आलेली असून, त्यातील १६ मालमत्तांचा जाहिर लिलाव करण्याची कार्यवाही सुरु आहे.
“मालमत्ता कर” थकविणा-या मालमत्ताधारकांविरुध्द, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे वसुलीची कटू कारवाई टाळण्याकरीता नागरीकांनी मालमत्ता कराचा भरणा त्वरीत करुन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मालमत्ता कर विभागामार्फत करण्यात आले आहे.