एमआयडीसीची भरती प्रकिया रखडल्याने कर्मचाऱ्यांवर ताण?

सर्वाधिक कामाचा ताण अग्निशमन दलावर

नवी मुंबई : एमआयडीसीमार्फत ऑगस्ट २०२३ मध्ये अ, ब आणि क श्रेणीतील एकूण ८०२ पदांसाठी भरती प्रकिया राबवली होती. यात सर्वाधिक २११ कर्मचारी हे अग्निशमन दलात भरती केले जाणार आहेत. मात्र ही भरती प्रकिया रखडल्याने विद्यमान अधिकारी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत असून सर्वाधिक कामाचा ताण अग्निशमन दलावर पडत आहे.

नवी मुंबईतील कळवा ते नेरूळ अशा ५३९.२५ हेक्टरवर औद्योगिक वसाहत वसली असून यात चार हजार उद्योग आहेत. सर्व परिसराचा कारभार महापे प्रादेशिक कार्यालयातून पहिला जातो. यासाठी या ठिकाणी प्रादेशिक अधिकारी, कार्यकारी अभियंता, उप अभियंता तसेच सहाय्यक अभियंता तैनात आहेत. या ठिकाणी सहा ते सात सहाय्यक अभियंता कमी आहेत. हीच परिस्थिती एमआयडीसीच्या इतर प्रादेशिक कार्यालयात आहे. त्याचप्रमाणे येथील औद्योगिक वसाहतीतील आगींवर नियंत्रण मिळावे म्हणून एमआयडीसीने औद्योगिक वसाहतीकरीता तुर्भे, पावणे आणि रबाळे अशा तीन अग्निशमन दलाची उभारणी केली आहे.

यातील पावणे अग्निशमन केंद्र ठाणे बेलापूर असोशियन तर्फे चालवले जात असून त्यास एम आय डी सी अनुदान देते. तिन्ही केंद्रात अवघे ४७ कर्मचारी तैनात आहेत. यात तुर्भे १३, पावणे १६ आणि रबाळे येथे १८ कर्मचारी कार्यरत आहेत. या ठिकणी एकूण नऊ वाहने उपलब्ध आहेत मात्र त्यासाठी लागणारे मनुष्यबळ मात्र अल्प आहे. प्रत्येक वाहनावर सहा कर्मचारी असणे गरजेचे आहे तसेच वाहचालकांची सुद्धा कमतरता आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना आठ तासांची पाळी करून १६ तास सजग राहावे लागते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर देखील कामाचा मोठा ताण पडत आहे. त्यामुळे औद्योगिक भागात एखादी आगीची मोठी घटना घडली तर हे अग्निशमन दल अपुरे पडत आहे. त्यामुळे अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांवरील पडणारा ताण कमी करण्यासाठी एमआयडीसीने एकूण २०२३ मध्ये २२१ जणांची भरती प्रकिया राबवली आहे. मात्र ही भरती प्रकिया रखडल्याने विद्यमान कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे.