हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाचे ‘शिट्टी’ चिन्ह धोक्यात

पालघर : पालघर जिल्ह्यात तीन आमदार असणाऱ्या बहुजन विकास आघाडी पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत शिट्टी हे जुने चिन्ह मिळवणे यंदाच्या निवडणुकीत आव्हानात्मक ठरणार आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्यातील मुख्य निवडणूक अधिकारी यांनी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) या पक्षाला दिल्याने बविआला ‘शिट्टी’ मिळविणे आता कठीण होऊन बसले असून यामुळे आता या पक्षाला अन्य चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल.

भारत निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांना ३० जानेवारी २०२४ रोजी पत्र पाठवून निवडणूक चिन्ह (आरक्षण व वाटप) आदेशान्वये शिट्टी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) या पक्षाला लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी घेण्याचे आदेशित केले होते. त्या अनुषंगाने मुख्य निवडणूक अधिकारी यांनी सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी यांना २ फेब्रुवारी रोजी त्या आशयाचे पत्र पाठवून सूचित केले. मे २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रसंगी पालघर लोकसभा क्षेत्रातून जनता दल (युनायटेड) या पक्षाने उमेदवार उभा केला नव्हता. त्यामुळे शिट्टी हे चिन्ह बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला मिळाले. महायुतीकडून राज्यातील प्रबळ पक्षात फूट पाडून नंतर चिन्ह गोठविण्याचे प्रकार घडले असताना विधानसभा निवडणुकीसाठी हेच तंत्र बहुजन विकास आघाडी विरुद्ध वापरले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बविआ कार्याध्यक्ष राजीव पाटील हे सध्या पक्षातून अलिप्त राहत असून बहुजन विकास आघाडीला धक्का देण्याच्या दृष्टीने त्यांच्या अथवा त्यांच्या समर्थकांमार्फत जनता दल (युनायटेड) या पक्षाच्या मार्फत निवडणूक लढवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

२०१९ मध्ये रिक्षा चिन्हावर लढवली होती निवडणूक

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीक भारत निवडणूक आयोगाने शिट्टी हे चिन्ह बहुजन महापार्टी या नव्याने निर्मित झालेल्या पक्षाला दिले होते. या पक्षाने या निवडणुकीत उमेदवार उभा केला होता. मात्र नाट्यमय घडामोडी होऊन केतन पाटील या बहुजन महापार्टीच्या उमेदवारांनी नंतर माघार घेतली होती. निवडणूक प्रक्रियेत शिट्टी या चिन्हाचा वापर झाल्याने तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बहुजन विकास आघाडीला शिट्टी हे चिन्ह देण्यास नकार दिल्याने बविआने ही निवडणूक रिक्षा या चिन्हावर लढवली होती. या निवडणुकीत शिवसेनेतर्फे निवडणूक लढविणाऱ्या राजेंद्र गावित यांनी बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांचा पराभव केला होता.