निवारागृहात राहणाऱ्या चार अल्पवयीन मुली बेपत्ता

उल्हासनगरमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल

उल्हासनगर : येथील कॅम्प क्रमांक 5 या ठिकाणी असलेल्या शासकीय निवारागृहात राहणाऱ्या चार अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात हिललाईन पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 13 ते 17 वर्षे वयोगटातील या मुली उल्हासनगर, उत्तर प्रदेश, बांगलादेश आणि मुंबईतील मानखुर्द येथील रहिवासी आहेत. शुक्रवारी रात्री 3.30 वाजण्याच्या सुमारास त्या निवारागृहातून बेपत्ता झाल्या आहेत. याबाबत निवारागृहातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी बेपत्ता मुलींचा आसपास शोध घेतला मात्र याबाबत काही ठोस माहिती हाती न आल्याने निवारागृहाच्या अधिकाऱ्याने शनिवारी रात्री हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 137 (2) (अपहरण) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले असून या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुरवाडे करीत आहेत.