सावत्र वडिलांच्या त्रासामुळे मुलीने सोडले घर

ठाणे : सावत्र वडिलांच्या त्रासाला कंटाळून बदलापूरमधील 15 वर्षांच्या शाळकरी मुलीने घर सोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्रीच्या रेल्वेने ती छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाली. या घटनेची खबर मिळताच दामिनी पथकाने रेल्वे स्थानकावर धाव घेत या मुलीस सुखरूप ताब्यात घेतले आहे.

वडिलांच्या त्रासाला कंटाळून बदलापूरची १५ वर्षांची सावत्र मुलगी घर सोडून बाहेर पडली. शुक्रवारी रात्री दोनच्या रेल्वेने ती छत्रपती संभाजीनगर शहरात आली. शनिवारी दिवसभर ती स्थानकावरच बसून राहिली. बदलापूर पोलिसांकडून दामिनी पथकाला त्याची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे दामिनी पथकाने स्थानकावर मुलगी बसल्याची माहिती मिळताच लगेच धाव घेते तिला सुखरूप ताब्यात घेतले आहे.

नुकतेच दहावी उत्तीर्ण झालेल्या या मुलीच्या आईने दुसरे लग्न केले होते. तिचे सावत्र वडील तिला त्रास देत होते, त्यामुळे कंटाळून गुरुवारी रात्री मोबाईल बंद करून तिने घर सोडले. दामिनी पथकाने विश्वासात घेतल्यानंतर तिने सर्व प्रकार सांगितला.

रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतल्यानंतर दामिनी पथकाने या मुलीला विश्वासात घेऊन नक्की काय झाले हे समजून घेतले. महिला पोलिसांनी या मुलीच्या कुटुंबाला संपर्क केला. यानंतर तिची आई रात्री छत्रपती संभाजी नगरमध्ये तिला घेण्यास निघाली. तिच्या जेवण राहण्याची व्यवस्था पोलीस करत असल्याचे पाहून मुलीला अश्रू अनावर झाले होते.