उपनगरांची मुंबई आणि नवी मुंबईशी होणार गळाभेट

* प्रवासाचे अंतर अर्धा ते एक तासाने कमी होणार
* अ‍ॅक्सेस-कंट्रोल्ड प्रकल्पासाठी १०,८३३ कोटी खर्च करणार

ठाणे : बदलापूर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर यांना मुंबई आणि नवी मुंबईशी जोडणा-या अ‍ॅक्सेस-कंट्रोल्ड महामार्गाच्या प्राथमिक संरेखन अहवालाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पासाठी सुमारे १०,८३३ कोटी खर्च अपेक्षित आहे.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर या शहरांमधून मुंबईत येण्यासाठी लागणा-या प्रवासाच्या वेळात ६० मिनिटांची तर नवी मुंबईपर्यंतच्या प्रवासाच्या वेळेत ३० मिनिटांची बचत होणार आहे. हा महामार्ग नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ‘एनएआयएनए’शी कनेक्टिव्हिटी करून देईल तसेच ठाणे आणि जवळपासच्या महामार्गांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत करणार होणार आहे.

या प्रकल्पात आठ मार्गिका असलेली विभाजित मार्गिका आणि सेवा रस्ते असतील. त्यामुळे ८० किमी प्रति तासाचा वेग कायम ठेवता येईल. प्रमुख मार्गांशी जोडण्यासाठी मोठ्या ‘इंटरचेंज’चा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यात मुंबई-वडोदरा स्पर, काटई-बदलापूर आणि कल्याण रिंग रोड यांचा समावेश आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची १५८ वी बैठक मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
या मास्टर प्लानच्या अंमलबजावणीसाठी २०२४-२५ साठी प्राधिकरणाने १०० कोटी रुपयांपर्यंतच्या प्रारंभिक बजेट मंजुरीस मान्यता दिली.   या बैठकीत मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) दळणवळण, पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकास वृद्धी करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी काही महत्त्वाच्या शहरी प्रकल्पांवरही चर्चा झाली आहे. बॅकबे रिक्लमेशनसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी विकास आराखड्यांचे पुनरावलोकन करण्यावरदेखील भर देण्यात आला. याशिवाय बदलापूर ते विरार मल्टीमोडल कॉरिडॉरसाठी ‘अ‍ॅक्सेस-कंट्रोल्ड महामार्ग’बद्दल चर्चा करुन मान्यता देण्यात आली.