खोकेवाल्यांनी कंटेनर दिले, त्यामध्ये सुपाऱ्या की नारळ?

मनसेचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

डोंबिवली : राज ठाकरेंच्या दौऱ्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली. याच टिकेला उत्तर देत मनसे आमदार राजू पाटील यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर चौफेर टीका केली आणि काही सवाल सुद्धा उपस्थित केले आहेत. याच मुद्द्यावर येत्या काळात ठाकरे गट आणि मनसेत जुपंण्याची शक्यता आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यावर आदित्य ठाकरे यांनी टीका केली होती. झोपलेला पक्ष, सुपारीबाज पक्ष या शब्दांत आदित्य ठाकरेंनी मनसेला डिवचले. यालाच उत्तर देताना मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले की, त्यांनी पहिले मागे जेव्हा शिवसेनेच्या फुटलेल्या आमदारांवर खोक्यांचे आरोप केले होते तेव्हा त्या आमदारांनी देखील आरोप केलेले की आम्ही खोके घेतले परंतु यांच्या घरी आम्ही कंटेनर पोहचवले आहेत, ते कंटेनर कसले होते? त्यांच्या सुपार्‍या होत्या की नारळ होते? याचे उत्तर द्यावे,नंतर आमच्याकडे बघावं,असे पाटील म्हणाले.

“पाच वर्षानंतर पक्ष झोपेतून उठलेला आहे. ते निवडणुकीच्या काळात जागे होतात, मग महाराष्ट्र पिंजून काढणार, असे त्यांचे दौरे चालतात. सुपारीबाज पक्ष आहे ते त्यांचं काम करतील. आम्ही आमचं जनतेच्या सेवेचं काम करत आहोत. गेल्या पाच वर्षांच्या काळात मग त्यामध्ये कोविडच्या काळात किंवा मुंबईत इतर काही घटना घडत असताना हा पक्ष दिसला तरी का? त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. सुपारीबाज पक्ष आहे तो तिथेच राहिल”, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी मनेसवर केला होता.