दहशतवाद गाडला, ३७० काढले.. अशक्य ते शक्य केले !

शिवाजी पार्कमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींची गॅरंटी

मुंबई : ज्यांना राम मंदिर निर्मिती अशक्य वाटत होती, ज्यांना 370 कलम हटवणे अशक्य वाटत होते, ते सगळे मी जनतेच्या आशिर्वादाने शक्य केले. गेल्या दहा वर्षांत देशाला पाचव्या क्रमांकावर घेऊन गेलो, येत्या काळात भारत हा जगातील तिसरी अर्थव्यवस्था असणार आहे असा विश्वासही नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

मुंबईतील शिवाजी पार्क येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा आयोजित केली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी बोलत होते. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणाची सुरूवात जय भवानी, जय शिवाजी अशी केली. ते म्हणाले की, मुंबई हे शहर फक्त स्वप्न दाखवत नाही तर स्वप्न जगते. काहीतरी करून दाखवणाऱ्यांना मुंबईने कधीही निराश नाही केले. या शहरासाठीच्या 2047 सालचे स्वप्न घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे. आपल्याला एक संकल्प करून विकसित भारत घडवायचा आहे. त्यामध्ये मुंबईचे योगदान मोठे असेल. भारतासोबत स्वतंत्र झालेले अनेक देश हे भारताच्या पुढे गेले. कमी भारतीयांमध्ये नव्हती तर इथल्या सरकारमध्ये होती. मी असे काही पंतप्रधान पाहिलेत की, त्यांनी लाल किल्ल्यावरून भारतीयांना आळशी म्हटलं आहे. ते देशाला कधीही पुढे घेऊन जाऊ शकले नाहीत. स्वातंत्र्यानंतर गांधींजींनी सांगितलं होतं की काँग्रेस बरखास्त करा. तसे झाले असते तर देश किमान पाच दशके पुढे असता. या सत्ताधाऱ्यांनी देशाची पाच दशके ही वाया घालवली.

श्री.मोदी म्हणाले, मी तुमच्या मुलांना एक विकसित भारत देऊन जाणार आहे. त्यासाठी मी 24 तास देशासाठी काम करणार आहे. निराशेच्या गर्तेमध्ये असलेल्या लोकांमध्ये आशा निर्माण करणे हे काही चणे खाण्याचे काम नाही. राम मंदिर बनणार नाही, ते अशक्य आहे असं लोकांना वाटायचं. गेल्या 500 वर्षात जे झाले नाही ते मोदीने करून दाखवले. काश्मीरमधून 370 कलम हटवणे हे अनेकांना अशक्य वाटत होते, आज त्या अशक्यतेला मी गाडून टाकले आहे. काँग्रेसने गेल्या 60 वर्षांमध्ये महिलांना आरक्षण देण्याचे स्वप्न दाखवले, पण मी ते करून दाखवले. ज्यांना स्वाभिमानाने जगायचे असेल त्यांनी घराबाहेर पडावे आणि मतदान करावे, अस आवाहन नरेंद्र मोदींनी केले. मतदानाला बाहेर पडताना आधी झालेले बॉम्बस्फोट आठवा आणि मतदान करा. मोदीला बळकट करण्यासाठी मतदान करा असे आवाहन नरेंद्र मोदींनी केले.

यावेळी व्यासपीठावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार, मुंबईतील महायुतीचे सर्व उमेदवार, राज्यातील मंत्री उपस्थित होते.