येऊरचा मामा-भांजे डोंगर अतिक्रमणमुक्त होणार

अतिक्रमण हटविण्यासाठी वनविभागाचा अल्टीमेटम

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरमधील मामा-भांजे डोंगरावरील ‘लॅड जिहाद’ उघडकीस आणल्यानंतर आता वनविभागानेही कारवाईचा हातोडा उगारला आहे. आठ दिवसांत अतिक्रमण न हटविल्यास धडक कारवाई केली जाणार असल्याचे आदेशही वनविभागाकडून काढण्यात आले आहेत. त्यामुळे लवकर येऊर येथील परिसर अतिक्रमणमुक्त होणार आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून मनविसेचे राज्य सरचिटणीस संदीप पाचंगे याबाबत पाठपुरावा करत असून अखेर प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, येऊर वनक्षेत्रातील मामा-भांजे दर्ग्याच्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण करण्यात आले आहे. याठिकाणी दर्ग्याशेजारी मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे करण्यात आली आहेत. याबाबत मनविसेने गेल्या दोन महिन्यांपासून कारवाईसाठी पाठपुरावा केल्यानंतर वन विभागाकडून दर्ग्याच्या अतिक्रमणाबाबत ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर जून महिन्यात याबाबतची सुनावणीही घेण्यात आली, पण यामध्ये ट्रस्टने कोणतेही वैध पुरावे सादर केले नाहीत. यानंतर आता वनविभागाने आठ दिवसात वनजमिनीवरील अतिक्रमण मुक्त करावे, असे आदेश पारित केले असून हजरत पीर मामू भांजे दरगाह ट्रस्टच्या वतीने हे अतिक्रमण स्वत:हून न हटविल्यास येऊर वनविभागाच्या वतीने अतिक्रमण हटविण्यात येईल. शिवाय याचा झालेला खर्चही ट्रस्टकडून वसूल केला जाणार आहे. तर कब्रस्थान अतिक्रमणाबाबत विविध कायद्यांतर्गत बाबी तपासून स्वतंत्र निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे येऊरवरील अतिक्रमण आता आठवड्याभरात हटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मामा कबर (पत्र्याचे शेड) – ८८.८ चौ.मी, भांजा कबर(पत्र्याचे शेड) – ११४.३ चौ.मी, मशिद (पत्र्याची) – ६७.२४ चौ.मी, शौचालय (पत्र्याचे) – १७.०८ चौ.मी, राहण्याचे शेड – १९१.१ चौ.मी, राहण्याचे शेड – ३९.२७ चौ.मी, हारविक्री दुकान (पत्र्याचे शेड)- ३७.०५ चौ.मी, पाण्यासाठी लोखंडी टाकी- ०६.७६ चौ.मी, कब्रस्थान- ४०० चौ.मी, एकूण-९६१.६ चौ.मी.

गेल्या दोन महिन्यांपासून गाजत असलेल्या ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरमधील मामा – भांजे डोंगरावरील ‘लॅड जिहाद’ प्रकरणाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आवाज उठविल्यानंतर पावसाळी अधिवेशनात याबाबत तारांकित प्रश्न विचारण्यात आला आहे.

मनसेच्या इशाऱ्यानंतर कारवाई होत आहे याचा आनंद आहे, मात्र वनविभागाच्या दुर्लक्षामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (येऊर) मध्ये अनधिकृत बांधकामे होत आहेत. कब्रस्तानासाठी एक एकर जागेचा वापर करण्यात आला आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या बांधकामास संपूर्ण जबाबदार वन विभागाचे अधिकारी आहेत. वन विभागाने कागदी घोडे नाचविण्यापेक्षा प्रत्यक्ष कारवाई करावी, अशी मागणी संदीप पाचंगे यांनी केली आहे.