नवी मुंबई : वाशीच्या एपीएमसी बाजारात हंगाम पूर्व हापूस आंब्याची आवक वाढण्यास सुरुवात झाली असून सोमवारी देवगड आणि रायगड हापूस आंब्याच्या तब्बल १२५ पेट्या दाखल झाल्या आहेत.
आवक वाढून देखील आंब्याचे दर अजून चढेच असून एका पेटीला ५ हजार ते १० हजार रुपयांचा दर आहे. मात्र मार्च महिन्यात मुख्य हंगाम सुरू होताच हे दर कमी होतील, अशी माहिती येथील व्यापाऱ्यांनी दिली.
डिसेंबर महिन्यापासून एपीएमसी फळ बाजारात अंजीर, स्ट्रॉबेरी, हापूस आंबा या फळांचा हंगाम सुरू होत असतो. मात्र यंदा बाजारात देवगडचा हापूस उशिराने दाखल होण्यास सुरुवात झाली. अवकाळी पावसाने हापूसच्या हंगामाला विलंब झाला आहे. त्यामुळे बाजारात जादा आवक होत नाही. मार्चमध्ये हापूसची आवक वाढेल, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.
सोमवारी एपीएमसीच्या बाजारात आलेल्या हापूस आंब्याच्या १२५ पेट्या ४ ते ८ डझनाच्या असून ५ हजार ते १० हजार प्रति पेटी असा आजच्या तारखेस हापूस आंब्याचा दर बाजारात सुरु आहे. तर रायगड हापूस प्रतिकिलो १०० ते २५० रुपयांवर आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत सोमवारी बाजारात १०० पेट्या अधिक दाखल झाल्या आहेत. मात्र आवक वाढली असली तरी हापूसचे दर मात्र स्थिर आहेत.
मार्च महिन्यात सुरु होणाऱ्या आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होते. मार्चमध्ये जवळ जवळ एक लाख पेट्या दाखल होतात. सध्या वातावरणात बदल होत असून, कडाक्याची थंडी उष्ण-दमट हवामानाने हापूसच्या उत्पादनाला फटका बसत आहे, अशी माहिती फळ व्यापारी संजय पिंपळे यांनी दिली.