भर पावसात वालधुनी नदीत रासायनिक सांडपाणी

अंबरनाथ : लोकसहभाग आणि प्रशासन यांच्या माध्यमातून वालधुनी नदी स्वच्छता अभियान राबवल्याची घटना ताजी असतानाच भर पावसाळ्यात त्याच वालधुनी नदीमधून भर पावसाळ्यात रासायनिक पाणी सोडल्याचे आढळले असल्याने खळबळ उडाली आहे.

अंबरनाथ नगरपालिका आणि सामाजिक संघटना, शाळा, महाविद्यालयाने, पर्यावरण प्रेमींच्या  मदतीने तीन महिने शिवमंदिराजवळून वाहणाऱ्या वालधुनी नदीत स्वछता अभियान राबवण्यात आले होते. अभियान राबवल्यानंतर नदीची स्थिती काहीशी सुधारली होती. वालधुनी नदीचे रूप काही अंशी पालटले होते. नदीच्या पात्रात नितळ पाणी दिसू लागले होते. त्यामुळे नदीच्या किनारी वृक्षारोपणही करण्यात आले. मात्र गेल्या तीन दिवसांपासून होणाऱ्या पावसाचा गैरफायदा घेत काही प्रदुषणकारी घटकांनी पुन्हा वालधुनी नदीत रासायनिक सांडपाणी सोडल्याचा संशय व्यक्त  होत आहे.

मंगळवारी सायंकाळनंतर वालधुनी नदीचे पात्र फेसाळले होते. दोन दिवसांपासून रात्रीच्या सुमारास नदीत मोठ्या प्रमाणावर फेस दिसून येत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाण्याच्या प्रवाहात फेसाळ थर दिसत असल्याची माहिती स्थानिकांनी  दिली आहे. त्यामुळे पुन्हा वालधुनी नदीच्या पात्रात रासायनिक सांडपाणी सोडल्याने पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.