राजकीय दबावामुळे मालिकेतून गच्छंती; ‘मुलगी झाली हो’तील अभिनेते किरण माने यांचा आरोप

मुंबई : ‘स्टार प्रवाह’वरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून अभिनेता किरण माने यांना कोणतीही पूर्वसूचना न देता तडकाफडकी काढून टाकण्यात आले. ही सांस्कृतिक दडपशाही असून हे राजकीय हस्तक्षेपातून घडल्याचा आरोप माने यांनी केला. त्यानंतर समाजमाध्यमे आणि राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे.

नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून अभिनय करणारे अभिनेते किरण माने ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत ‘विलास पाटील’ ही भूमिका साकारत होते. वेगळा विषय आणि उत्तम मांडणी यामुळे ही मालिका लोकप्रिय ठरली होती. किरण माने यांचा समाजमाध्यमांवर मोठा चाहता वर्ग आहे. ते आपली राजकीय मते समाजमाध्यमांतून सडेतोड मांडत आले आहेत. ही मते केंद्र सरकार आणि भाजपविरोधी असल्याचे त्यांच्या लेखनातून जाणवते. त्यामुळे भाजप समर्थकांशी कायमच त्यांची खडाजंगी होत असते.

अशाच धाटणीचे एक विधान त्यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर भाजप समर्थकांनी आपल्यावर टीका करण्यास सुरुवात केली. या टीकेचे वादात आणि पुढे धमकीवजा संदेशात रूपांतर झाले, अशी माहिती माने यांनी दिली. कोणतीही कल्पना नसताना त्यांना मालिकेतून तडकाफडकी काढून टाकण्यात आले. वाहिनीशी त्यांनी वारंवार संपर्क साधला, परंतु  त्यांना कोणतेही उत्तर मिळाले नाही. हे राजकीय दबावातून झाले असल्याचे वाहिनीतील एका व्यक्तीने त्यांना सांगितले. ही अभिव्यक्तीची हत्या असल्याचे माने यांनी सांगितले. या सर्वात भाजपचे नाव पुढे आल्याने समाजमाध्यमांवर शुक्रवारी मोठा राजकीय गदारोळ पाहायला मिळाला.

यासंदर्भात वाहिनी आणि निर्मात्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

 घडले काय?

 काही दिवसांपूर्वी माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. त्यामध्ये कोणाचेही नाव नव्हते परंतु त्याचा संबंध भाजप समर्थकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्याशी जोडला. त्यानंतर हा वाद अधिकच चिघळला. माने यांच्या मताला विरोध दर्शवणारे अधिक आक्रमक झाले आणि दोन्ही बाजूंनी मर्यादा सोडून संवाद होऊ लागले. समाजमाध्यमांद्वारे त्यांना अनेक धमक्या येऊ लागल्या आणि अशातच त्यांना मालिकेतून काढून टाकल्याचे समजले. यामागे राजकीय दबाव असल्याचे वाहिनीतील एका प्रतिनिधीने त्यांना कळवले. राजकीय हस्तक्षेपामुळे काम गमवावे लागल्याचे त्यांनी समाजमाध्यमांवर जाहीर करत या घटनेचा निषेध केला. त्यानंतर त्यांच्या पािठब्यासाठी अनेक चाहते एकवटले. राजकीय आणि कला वर्तुळातूनही या प्रकाराबद्दल निषेध व्यक्त होतो आहे.