जिल्ह्यातील धरणांमध्ये ४० टक्के पाणीसाठा शिल्लक

कडकडीत उन्हामुळे बाष्पीभवन वेगाने

ठाणे: वाढलेल्या उष्णतेमुळे धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाल्याने जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. परिणामी, जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा हा ४० टक्क्यांवर आला आहे.

एप्रिल आणि मे महिन्यात कमालीची उष्णता वाढल्याने याचा परिणाम धरणांमधील पाणी साठ्यावर झाला आहे. धरणांतील पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्याचा परिणाम मुंबई, ठाणे शहर परिसराला करण्यात येणाऱ्या दैनंदिन पाणी पुरवठ्यावर काही प्रमाणात झाला आहे. मागील पाच ते सहा वर्षापूर्वी जून, जुलै सरला तरी पावसाने ओढ दिल्याने धरणसाठा तळाला गेला होता. नागरिकांना दैनंदिन पाणी पुरवठा कसा करायचा असा प्रश्न शासनासमोर निर्माण झाला होता. त्यानंतर शासनाने दरवर्षी दिवाळीनंतर पाऊस पडेपर्यंत आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय यापूर्वी घेतला होता. यामुळे जून अखेरपर्यंत पुरेसा पाणी साठा पिण्यासाठी उपलब्ध होत होता.

गेल्या दोन ते तीन वर्षापासून ठाणे जिल्ह्यातील भातसा, वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, बारवी या धरणांमध्ये ऑगस्ट, सप्टेंंबरमध्ये १४ लाख ५० हजार दशलक्ष लिटर पाणी साठा पावसाच्या माध्यमातून जमा होतो. गेल्या दोन महिन्यापासून तापमान ४० अंशाच्या पुढे जात आहे. धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन अधिक प्रमाणात झाल्याने मुंबई, ठाणे शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्यात कपात केली जाते की काय अशी चिंता नागरिकांमध्ये आहे. मात्र जलसंपदा विभागाने अशाप्रकारची कपात होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

भातसा धरणाची पाणी साठवण क्षमंता ३२४ दशलक्ष घनमीटर, तानसा ४८ दशलक्ष घनमीटर, मोडकसागर २६ दशलक्ष घनमीटर, बारवी १२१ दशलक्ष घनमीटर, मध्य वैतरणा २२ दशलक्ष घनमीटर आहे. या धरणांमध्ये सद्य परिस्थितीत सुमारे ३५ ते ४० टक्के पाणी साठा आहे. हा साठा पाऊस पडेपर्यंत पुरेसा असल्याचा दावा जलसंपदा विभागाकडून करण्यात आला आहे.