‘वागळे’ची उद्योगनगरी डबघाईच्या मार्गावर

ठाणे : ठाण्यामध्ये अनेक उद्योगधंदे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. अशा सर्व उद्योगधंद्यांना सरकारी मदतीची फार मोठी अपेक्षा आहे. ही मदत मिळाली तरच अनेक उद्योगधंदे बंद होण्यापासून वाचू शकतात. आशियामधली सगळ्यात मोठी समजली जाणारी वागळे इंडस्ट्रियल इस्टेट आता हळूहळू आपली इंडस्ट्रीची ओळखही विसरू लागली की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
भारतातील सर्वात मोठा इंड्रस्ट्रीयल एरिया वागळे इस्टेटला ओळखले जायचे. मात्र आता हा इंड्रस्ट्रीयल एरिया डबघाईला आला असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या सुरू असलेले अनेक उद्योगधंदे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कोरोनानंतर अनेक व्यवसाय बंद पडले तर नवीन व्यवसायिकांनासुद्धा कोरोनाचा फटका बसून महागाई वाढली. यामुळे आवक घटली. त्यांचा परिणाम पूर्ण इंड्रस्ट्रीजवर पडलेला दिसून येतो. यावर व्यावसायिकांनी सरकारने मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
टिसाचे उपाध्यक्ष आशिष शिरसाट यांनीही उद्योगांच्या सद्यस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, कोविड काळात तर मोठा फटका उद्योगांना बसला. त्यावेळेस गावी गेलेले अनेक कामगार न परतल्याने कुशल कामगारांची कमरता भासू लागली. त्याचबरोबर गेल्या दोन एक वर्षात भारतातील स्टीलच्या किमती जवळपास तिप्पट झाल्या आहेत. कच्चा मालाच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास सुरुवात झाली. या दरांना नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असतानाच आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या परिणामामुळे विविध धातु आदी कच्चा मालाची दरवाढ झाली. त्यात आता रशिया व युक्रेन युद्धाची भर पडल्याने कच्चा मालाचे दर तिप्पट झाले आहेत. परिणामी उद्योगांची वाट खडतर बनल्याचे त्यांनी सांगितले.
उद्योगधंद्यांच्या मंदीबाबत टिसाच्या अध्यक्षा सुजाता सोपारकर म्हणाल्या की, कोरोना काळात ज्या उद्योगांनी तग धरला तेच तरले आहेत. इतर सर्व उद्योग-व्यवसाय रसातळाला गेले. सध्या नवनवीन तंत्रज्ञान येत आहे, यामुळे तरुण उद्योजकांना नविन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी आहेत.
उद्योगांची जागा घेतली आयटी क्षेत्राने
वागळे इंडस्ट्रियल इस्टेटमधील अनेक उद्योग बंद झाल्यानंतर त्यांच्या जागेवर मोठे आयटी हब उभे राहिले आहेत. मूळचा हक्काचा वसा असलेला इंडस्ट्रीचा व्यवसाय मात्र काही वर्षात वागळे इस्टेटमधून लुप्त पावलेला आहे. वागळे इस्टेटमध्ये आजही एमआयडीसीचे अस्तित्व आहे मात्र या एमआयडीसीकडून कोणत्याही प्रकारे मदत मिळत नसल्यामुळे अनेक उद्योग धंदे हे इतरत्र गेल्याचे चित्र ठाण्यात पाहायला मिळत आहे.