मुंबई: राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध करण्याच्या महाविकास आघाडीच्या प्रयत्नांना अपयश आले असून आता राज्यसभेसाठी निवडणूक होणार आहे. शिवसेना आणि भाजपचे उमेदवार रिंगणात असले तरी महाविकास आघाडी सरकारची प्रतिष्ठा या निवडणुकीत लागली आहे. सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडीला प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे. आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान भाजपने ‘मविआ’ची ऑफर धुडकावली ‘वर्षा’वर महाविकास आघाडीची बैठक पार पडणार आहे.
राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, शिवसेनेचे नेते खासदार अनिल देसाई, काँग्रेस नेते सुनिल केदार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने भाजपने तिसरा उमेदवार मागे घ्यावा आणि राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली.
भाजपने राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यास मदत केल्यास त्याची परतफेड विधान परिषद निवडणुकीत केली जाईल. त्यानुसार, विधान परिषद निवडणुकीत मविआकडून भाजपला आणखी एक जागा देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. विधान परिषदेसाठी 10 जागांवर निवडणूक होणार आहे. संख्याबळानुसार भाजपच्या चार जागा निश्चित समजल्या जात आहेत. मविआकडून भाजपला पाचवी जागा देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. तिसरा उमेदवार कायम ठेवण्याच्या भूमिकेवर भाजप ठाम राहिले. भाजपने मविआने राज्यसभा निवडणूक बिनविरोध केल्यास विधान परिषदेसाठी पाचवी जागा लढवणार नसल्याचे म्हटले. भाजपने दिलेल्या या प्रस्तावावर महाविकास आघाडीत खल झाला. मात्र, शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार कायम ठेवण्याची भूमिका घेतली.
विधानसभेतील आमदार या निवडणुकीसाठी मतदान करतात. सध्या असलेल्या विधानसभा आमदारांच्या संख्याबळानुसार, भाजपचे दोन उमेदवार सहज विजयी होऊ शकतात. तर, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा प्रत्येकी एक उमेदवार सहज विजयी होऊ शकतो. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले अतिरिक्त मते आणि महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांच्या बळावर शिवसेना सहावी जागा जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. तर, भाजपलादेखील सहावी जागा जिंकण्यासाठी 13 च्या आसपास मतांची आवश्यकता आहे.
राज्यसभा निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदार आणि शिवसेना समर्थक अपक्ष आमदारांना 8 ते 10 जून दरम्यान मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यसभा निवडणुकीसाठी येत्या 10 जून रोजी विधान भवनात मतदान होणार आहे. त्यापूर्वी कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना 8 जून रोजी मुंबईत दाखल होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.