एपीएमसीत कांदा नरमला; तरीही किरकोळीत दुपटीने चढला!

पावसाच्या नावाने सर्वसामान्यांची पिळवणूक

नवी मुंबई: वाशीतील एपीएमसी कांदा-बटाटा घाऊक बाजारात सध्या पावसामुळे कांद्याला उठाव कमी आहे. त्यामुळे बाजारात कांद्याचे दर उतरले आहेत. तरी देखील किरकोळ बाजारात कांद्याची दुप्पट दराने विक्री होत आहे.

एपीएमसी घाऊक बाजारात प्रतिकिलो कांदा ११-१६ रुपयांनी विक्री होत आहे. किरकोळ बाजारात मात्र प्रतिकिलो २५-३०रुपये असे दुप्पट दराने विक्री होत आहे. यावर्षी अवकाळी पावसामुळे कांद्याच्या पिकावर परिणाम होऊन दर्जा घसरला आहे. त्यामुळे बाजारात सध्या २०टक्के उत्तम दर्जाचा कांदा दाखल होत आहे. मागील आठवडाभरापासून पावसाचा जोर वाढल्याने आलेला बहुतांश कांदा भिजत आहे. त्यामुळे बाजारात उच्चतम कांद्याला अधिक मागणी असल्याने दर वधारत होते. मात्र मागील आठवड्यापासून एपीएमसीत कांद्याचे दर कमी होऊन दर कमी झाले आहेत.

बाजारात उच्चतम प्रतिचा कांदा १८-२२रुपयांनी कांदा विक्री होत होता. परंतु आता दर कमी झाल्याने कांदा कमीत कमी १० रुपये तर जास्तीत जास्त १६ रु.प्रती किलोने विक्री होत आहे. घाऊक बाजारात दर उतरले असताना देखील किरकोळीत मात्र २५-३०रुपयांनी विकले जात आहेत.
लसणाच्या दरात घसरण

एपीएमसी बाजारात सध्या पावसामुळे आणि श्रावण महिना सुरु झाल्याने लसणाची विक्री कमी होत आहे. तसेच बाजारात व्यापाऱ्यांकडे शिल्लक लसुण असल्याने प्रतिकिलो दरात १०-२०रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे आधी एपीएमसीत उटी लसूण १४५-१८० रुपयांनी विक्री होत होता, तो आता १४०-१६० रुपयांनी आणि देशी लसूण १२०-१५० रुपयांवरून १२०-१४० रुपयांनी विक्री होत आहे.