मालगाडी-इंजिनचे ‘बंध’ तुटले, मध्य रेल्वेवर लोकलचा खोळंबा

डोंबिवली : मालगाडीचे डबे इंजिनापासून वेगळे झाल्याची घटना नेरळ-वांगणी मार्गावर बुधवारी सकाळी ७.५४ वाजताच्या सुमारास घडली. त्यामुळे कर्जत ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/कल्याण लोकल वाहतूक ठप्प झाली होती. मात्र सकाळी सव्वा आठ वाजताच्या सुमारास बिघाड दुरुस्त करून लोकल वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.

ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळच्या वेळेस प्रवाशांची गैरसोय झाली होती. मालगाडीचे डबे वेगळे झाल्याच्या घटनेमुळे कुटुंबासह निघालेल्या नागरिकांचे ठिकठिकाणी हाल झाले.

मालगाडीच्या तांत्रिक बिघाडामुळे कल्याण ते कर्जत मार्गावरील लोकल सेवा काही काळ विस्कळीत होऊन वेग मंदवला होता. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवाजी मानसपुरे यांनी मालगाडीबाबतची माहिती माध्यमांना दिली.

बुधवारी रक्षाबंधन असल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती. नेरळ वांगणी दरम्यान झालेल्या बिघाडानंतर कर्जत, बदलापूर, कल्याण येथील प्रवासी काही काळ ताटकळले होते. लवकरात लवकर समस्या सुटावी आणि प्रवास सुरु व्हावा, यासाठी प्रवाशांनी धावा केला होता.

दरम्यान, मंगळवारी कल्याणला फलाट ६/७ वर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता, त्यामुळे समस्या झाली होती, तेव्हाही सकाळी पहिल्या सत्रात बिघाड झाल्याने रेल्वे प्रवासी, चाकरमान्यांचे हाल झाले होते, त्यामुळे सर्वसामान्यांना फटका बसत असल्याने प्रचंड नाराजी व्यक्त केली जात होती.