म्हाडाचा ऐतिहासिक निर्णय
ठाणे: म्हाडाने बांधलेल्या परवडणाऱ्या घरांचा ताबा देण्यास उशिर झाल्याने कल्याण तालुक्यातील खोणी आणि शिरढोण येथील लाभार्थ्यांचे आर्थिक नुकसान झाले होते. या लाभार्थ्यांचा शेवटचा १० टक्क्यांचा हफ्ता माफ करण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली होती. म्हाडाच्या बैठकीत या ठरावाला मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे लाभार्थ्यांचे सुमारे ३२ कोटी रूपये वाचणार असून त्यांना दिलासा मिळाला आहे.
म्हाडामार्फत विविध शहरांमध्ये उभारण्यात येणारी घरे ही किफायतशीर दरात नागरिकांना मिळत असतात. याच पद्धतीने म्हाडाच्या वतीने कल्याण तालुक्यातील खोणी आणि शिरढोण तालुक्यात परवडणाऱ्या दरातील घरे उभारण्यात आली होती. या घरांसाठीची २०१८ साली सोडत काढण्यात आली होती. तर २०२१पर्यंत विजेत्यांना घराचा ताबा देणे अपेक्षित होते. या दरम्यान आले कोरोनामुळे ही प्रक्रिया धीम्या गतीने राबविली गेली. त्यामुळे लाभार्थ्यांना घरांचा ताबा मिळाला नाही. त्याचवेळी या घरांच्या कर्जापोटी लाभार्थ्यांना बँकांचे हफ्ते भरावे लागत होते. एकीकडे ताबा न मिळालेल्या घरांचा हफ्ता तर दुसरीकडे ज्या घरात भाड्याने राहतो त्या घराचे भाडे अशा दुहेरी आर्थिक कोंडीमध्ये हे लाभार्थी अडकले होते. त्यातच कोरोनामुळे नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडल्याने लाभार्थ्यांचे हाल सुरू होते. या लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी घराचा शेवटचा हफ्ता माफ करण्यात यावा, अशी मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी म्हाडा प्रशासनाकडे केली होती. याबाबत त्यांनी कोकण गृहनिर्माण महामंडळ आणि म्हाडा समवेत अनेकवेळा बैठका घेत पत्रव्यवहार देखील केला होता. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत कोकण गृहनिर्माण मंडळातर्फे नागरिकांच्या घराचा शेवटचा हफ्ता माफ करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारने येताच याबाबतचा सकारात्मक निर्णय घेतला. नुकत्याच झालेल्या म्हाडाच्या बैठकीत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
म्हाडा प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे खोणी आणि शिरढोण प्रकल्पातील प्रत्येक विजेत्याचे एक लाख ६३ हजार रुपयांनुसार सर्व नागरिकांचे ३२ कोटी ६२ लाख रुपये वाचले आहेत. लाभार्थ्यांची संख्या दोन हजारांहून अधिक आहे.